नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव शहरातून बाराही महिने वाहणारी आणि माणगाव तालुक्यातील वरदायिनी म्हणून ओळख असलेली काळ नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. या नदीच्या पात्रात कचरा टाकला जात आहे. सांडपाणी सोडण्यात येत आहे. मातीच्या भरावयाची माती टाकल्यामुळे लालसर तवंग आलेला आहे. त्यामुळे नागकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत नदी किनारी बेकायदेशीरपणे इमारती, बंगले आणि घरे बांधण्यात आलेली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार नदी किनार्यापासून 100 मीटर अंतरात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. तरीही नदी किनार्यालगत बेकायदेशीर बांधकामे सुरूच आहेत. त्यामुळे कचरा आणि मोठ मोठ्या इमारतीचे सांडपाणी काळ नदीपात्रात बिनदिक्कत सोडण्यात आले आहे. तसेच शौचालयाचे मलमूत्र सोडण्यात आल्याने नदी दूषित झाली आहे. 1995 मध्ये दूषित पाण्यामुळे माणगाव शहरात काविळीची साथ येऊन त्यात तीन जण दगावले होते. हे दूषित पाणी माणगाव शहरातील भादाव, उतेखोल, खांदाड, जुने माणगाव आणि नदी काठावरील गोरेगावसहीत सुमारे 50 गावांपर्यंत पोहोचत असल्याने त्यांच्याही आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. माणगाव नगरपंचायतीमध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र सुरू असल्याने किमान शुद्ध पाणी मिळत आहे. मात्र, नदीकिनारी असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जलशुद्धीकरण केंद्र अस्तित्वातच नसल्याने तेथे नदीचे दूषित पाणी थेट गावात आणि घरात जात आहे. त्यामुळे तेथील नागरिक विविध प्रकारच्या आजारांना नाहक बळी पडत आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून काळ नदीवर शहरातील मुंबई-गोवा महामार्ग पूल, उतेखोल कोकण रेल्वे पूल आणि उतेखोल आदिवासी वाडीजवळील मुंबई-गोवा महामार्ग बायपास पूल अशा तीन पुलांची कामे सुरू आहेत. त्यांनी बांधकाम करताना वापरलेले बांधकाम साहित्य, माती, डबर, खडी, सिमेंट आदी साहित्य काळ नदी पाणी पात्रात मिसळल्याने काळ नदी प्रदूषित झाली आहे. पाणी गढूळ होऊन नदीच्या पाण्यावर लालसर तवंग आलेला आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी योग्य राहिलेले नाही, असे नागरिकांनी आरोप केला आहे.
पाच वर्षांपूर्वी काळ नदीच्या जलप्रदूषणाबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर महाड येथील प्रदूषण नियंत्रण कार्यालयाने नदी काठावरील इमारतींचे बेकायदेशीरपणे सोडलेले सांडपाणी बंद करण्यात यावे, असे आदेश दिले होते. त्यामुळे ते बंद केले होते. आता तीन पुलांच्या कामांची माती, नदीत कचरा बेदरकारपणे फेकण्याची वृत्ती, कपडे, भांडी, गाड्या, जनावरे नदीत धुणे यामुळे काळ नदी अधिक प्रदूषित होत आहे. त्यामुळे कधी कधी मासेही मरत असतात.
याबाबत नगरपंचायतीमध्ये विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, माणगाव शहराला जलशुद्धीकरण केंद्रामार्फत स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. कोणत्याही इमारतीचे सांडपाणी नदीत सोडण्यात आलेले नाही. काळ नदी प्रदूषित करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.