वाढत्या वायू प्रदूषणाच्या चर्चा अलिकडच्या काळात चिंतेचा विषय ठरू लागल्या असून या हवेतील प्रदूषणाचे घातक परिणाम होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर हवेची गुणवत्ता हा सातत्याने देखरेखीचा, अभ्यासाचा विषय बनत चालला आहे. या संदर्भात आयक्यू एअर या स्विस कंपनीने जारी केलेल्या जागतिक गुणवत्ता अहवालानुसार 2021 मध्ये भारतातील वायुप्रदूषण सर्वाधिक झाले आहे. प्राणघातक आणि सूक्ष्म घटकांसह सरासरी वायू प्रदूषण सदर प्रदूषकामध्ये मोजले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या हवेच्या गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वांच्या दसपट जास्त प्रदूषण दिसून येत असून भारतातील कोणतेही शहर जागतिक आरोग्य संघटनेच्या हवेच्या गुणवत्तेचे मानक पूर्ण करत नाही. ही बाब किती गंभीर हे या निष्कर्षावरून समजायला हरकत नाही. यातील तपशील पाहिल्यास, उत्तर भारतातील स्थिती वाईट आहे हे लक्षात येते. दिल्ली सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरली आहे. इतकेच नव्हे तर मागील वर्षाच्या तुलनेत प्रदूषण जवळपास 15 टक्क्यांनी वाढले आहे. दिल्लीचे वायू प्रदूषण जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर असून जगातील सर्वात ठिकाण म्हणजे राजस्थानचे भिवंडी ठरले आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशातील गाझियाबाद या दिल्लीच्या पूर्व सीमेवरील शहराचा क्रमांक लागला आहे. थोडक्यात, जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी दहा राजधानीच्या आसपास आहेत. तथापि, 2020 मधील जागतिक वायू गुणवत्ता अहवालाच्या पूर्वीच्या आवृत्तीत भारताच्या खराब वायूचे हे विश्लेषण नाकारले होते. प्रामुख्याने उपग्रह आणि इतर दुय्यम माहितीच्या ते तयार केले गेल्याचा आक्षेप नोंदण्यात आला होता. मात्र 2021 च्या भारतातील सरकारी आकडेवारीनुसार देखील दिल्ली, कोलकाता आणि मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब आहे. या स्विस संस्थेने आपल्या माहितीच्या अस्सलतेबाबत म्हटले आहे की त्यांची माहिती प्रत्यक्ष ठिकाणची असून जवळपास जागतिक स्तरावर निम्म्या ठिकाणी सरकारी यंत्रणेद्वारे ती हाताळली जात आहे. त्यामुळे माहिती नाकारण्यात फारसा अर्थ नाही. कारण सदर अहवालात भात कापणीनंतर पीक जाळण्यापासून निघणार्या धुराचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या शेतकरी आंदोलनाच्या काळात हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मुद्दा बनला होता. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष सामान्यतः शेतकर्यांवर कारवाई करण्याबाबत संयम बाळगून असतात. हा धूर दिल्लीतील जवळपास 45 टक्क्यांपर्यंतच्या प्रदूषणास कारणीभूत विशेषत: हिवाळ्याच्या महिन्यांत दिल्लीजवळील भाताच्या शेतात पुढच्या पिकाची कापणी आणि पेरणी दरम्यान अवकाश असल्याने त्याचा वापर शेतकरी अशा प्रकारे करतात, असे अहवाल म्हणतो. आपले या विषयावरील दुर्दैव असे की भारतात नोंदली गेलेली सर्वात स्वच्छ हवा तामिळनाडूच्या अरियालूरमध्ये आढळली आहे. पण तरीही ती जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सुरक्षित हवा पातळीच्या तिप्पट प्रदूषित आहे. वायू प्रदूषण हे मुख्यत्वे, वाहन वाहतूक, इंधनाचे विविध प्रकारे होणारे दहन, कोळसा, लाकुड, वाळलेले गवत यांसारख्या जीवाश्म इंधनाचे जळण तसेच बांधकामे आदीच्या मार्फत होते. बांधकामांसोबत खराब रस्ते व जीवाश्म इंधनांचे ज्वलन तसेच धुळीच्या कणांचे प्रदूषणही ही स्थिती बिघडण्यास जबाबदार आहेत. निवासी वस्त्या व वाणिज्यिक कार्यालये आणि देखील वायू प्रदूषणास हातभार लावतात. सुस्थितीतील वाहने चालवल्यास तसेच शक्य असेल तेथे पायी चालून गेल्यास यात बदल होऊ शकतो. सायकलचा वापर करुन व सार्वजनिक प्रवासी यंत्रणांचा वापर करुन, वायू प्रदूषण कमी करता येते. टाकाऊ पदार्थ, केरकचरा व वाळलेले गवत व पाने जाळण्याचे थांबवा, असे आवाहन अनेकदा केले जाते, परंतु कोणीही लक्ष देत नाही, अशी परिस्थिती आहे. झाडे लावा आणि पर्यावरणाला नुकसानकारक असलेल्या उत्पादनांची खरेदी टाळा, अशीही आवाहने होतात आणि मोहीमा काढल्या जातात. पण त्याचा फार फायदा होताना दिसत नाही. जेथे आपण राहतो तेथील वातावरण स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्याची जबाबदारी आपली आहे, असे आपल्याला वाटत नाही. सरकारही या प्रश्नााकडे पुरेशा गंभीरपणे घेत नाही. असे अहवाल आपल्याला जागे करण्यासाठी असतात, त्याकडे आपण गंभीरपणेच पाहिले पाहिजे. वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या दीर्घकालीन समस्या उद्भवतात. त्यामुळे श्वासोच्छवासात अडचण येणे, दमा, खोकला यासारखे श्वसन व हृदयासंबंधीचे आजार जडू शकतात. लहान मुलांवरील हा परिणाम अधिकच घातक असतो. त्यामुळे या अहवालाला आपला हेल्थ रिपोर्ट समजून स्थिती पावले उचलायला हवीत.