भास्कर खंडागळे
गेल्या काही वर्षांमध्ये आशिया खंडात वाढत्या उष्णतेमुळे मृत्युमुखी पडणार्यांची संख्या वाढली आहे. नवीन पिढीला जीव जपण्याच्या पारंपरिक पद्धतींचा अवलंब करावासा वाटत नाही, हे यामागील मुख्य कारण. पश्चिम आणि मध्य भारतातील अनेक शहरांनी गेल्या पन्नास वर्षांमधला सर्वात उष्ण फेब्रुवारी अनुभवल्यानंतर यंदा उष्णतेचे सर्व विक्रम मोडतील, अशी भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. वाढत्या तापमानामुळे जग चिंतीत आहे.
हवामान खात्याने दिलेला इशारा लक्षात घेऊन भारत सरकारने अनेक राज्यांना उष्णतेमुळे उद्भवणार्या आजारांपासून सावध राहण्याचा जाण्याचा इशारा दिला आहे. ही तयारी एका आंतरराष्ट्रीय संस्थेने दिलेल्या इशार्याची आठवण करून देते. 2030 पर्यंत जगातील अनेक देशांमध्ये तापमानाचा पारा इतका वाढेल की मानवाला तो सहन करणेही कठीण होईल, हा इशारा निराधार वा पोकळ नाही. गेल्या वर्षी युरोपमधल्या अनेक देशांना वाढत्या उष्णतेच्या कहराचा सामना करावा लागला होता. उष्णतेमध्ये वितळू नये म्हणून लंडन ब्रिज उष्णता-प्रतिरोधक शीटने झाकण्यात आला होता. फ्रान्समध्ये उष्णतेमुळे रेल्वेसेवा बंद करावी लागली होती. युरोपमधल्या अनेक शहरांमध्ये उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला होता. अमेरिकेपासून ब्राझीलपर्यंत जंगले धुमसत असल्याच्या घटनांनी लोकसंख्येच्या मोठ्या भागाला दीर्घकाळ त्रास दिला आहे. अशा प्रकारे वातावरणात उष्णता वाढत आहे, कारण आपण पर्यावरणाबाबत संवेदनशील नाही. संशोधकांच्या मते 1850 ते 1900 या काळात अशा अनेक सवयी आपल्या जीवनशैलीत समाविष्ट केल्या गेल्या, ज्या हळूहळू संपूर्ण पर्यावरणासाठी एक मोठे आव्हान बनल्या. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढही तेव्हापासून सुरू झाली. विशेषत: औद्योगिकीकरणाची घोडदौड आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जास्तीत जास्त शोषण करण्याच्या हेतूने परिस्थिती अनियंत्रित केली आहे.
आज जीवाश्म इंधनाचा वापर, जंगलतोड आणि विकासाच्या नावाखाली विषारी वायूंचे उत्सर्जन यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, ओझोनचा थर सतत कमकुवत होत आहे. उत्सर्जित वायू ओझोन थराची धूप वाढवत आहेत. जंगलतोडीमुळे ग्रीन हाऊस इफेक्टच नाही तर पृथ्वीचे तापमानही वाढत आहे. अलिकडेच हवामानबदलाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय गटाने अहवाल दिला आहे की 30 टक्के कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जनाला जंगलतोड कारणीभूत आहे. तो जगातील तापमान वाढवण्यासाठी जबाबदार असणार्या वायूंपैकी एक असून मोठ्या प्रमाणात जंगले तोडल्यामुळे ऑक्सिजन निर्मितीचा मोठा स्रोत संपला आहे. दुसरीकडे, कारखान्यांपासून रस्त्यावरील वाहनांच्या वाढत्या संख्येपर्यंत शहरी भागात कार्बन उत्सर्जन इतके वाढले आहे की जगातील सर्व देशांना कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमीत कमी करण्याचा विचार करणे भाग पडत आहे.
कार्बन उत्सर्जन नियंत्रणाबाबत धोरणे ठरवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जागतिक परिषदा होत आहेत. 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जनाचा किमान दर गाठला गेला पाहिजे, यावर जगातील सर्व बड्या देशांचे एकमत आहे. पण हे कसे होईल, यावर विविध क्षेत्रांचे हितसंबंध अपेक्षित परिणाम होऊ देत नाहीत. विकसित देश गरीब देशांना मान्य केलेला निधी देण्यास टाळाटाळ करत आहेत तर विकसनशील देश आणि अविकसित देश आपल्या विविध योजनांद्वारे विकसित देशांनी पर्यावरण संतुलन बिघडवले असल्याचे सांगत इच्छित धोरणांपासून मागे हटत आहेत. योग्य मोबदला मिळत नसेल तर त्यांनी दुसर्याच्या विकासासाठी पैसे का द्यावेत, हा प्रश्न उभा रहात आहे. झाडे तोडण्याबरोबरच अशास्त्रीय नगर नियोजन, वाढती लोकसंख्या, डांबरी रस्त्यांची वाढती संख्या, कॉम्प्युटरचा प्रचंड वापर, एअर कंडिशनर, फ्रीज यांसारख्या उपकरणांचा वाढता वापर हेही पर्यावरण प्रदूषित करणारे घटक आहेत. शहरांमधील वाढत्या बांधकामांमुळे वार्याचा वेग कमी झाला असून अपेक्षित थंडीचा परिणाम होत नाही. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, शहरांमधील इमारतींचे वाढते जंगल तापमान वाढण्यास कशी मदत करत आहे, हे एका उदाहरणाने समजू शकते.
मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये खूप दाट वस्ती आहे. पूर्वी समुद्राचे वारे मुंबईहून पुण्यापर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय पोहोचत असत आणि उन्हाळ्यातही लोकांना पंख्याची गरज भासत नसे. पण आता उंच इमारतींनी समुद्राकडून येणारे वारे अडवायला सुरुवात केली आहे. राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्ली या राज्यांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत लोक छतावर आरामात झोपायचे; मात्र आता हे कठीण झाले आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या दोन दशकांमध्ये पृथ्वीच्या तापमानात अनपेक्षितपणे वाढ झाली आहे. विसंगती अशी आहे की, लोकांनी कृत्रिम सुविधांनाच खरा आनंद मानला आहे. पूर्वी लोक उन्हात जाताना डोके झाकून घ्यायचे. उष्माघात टाळण्यासाठी घरगुती उपाय करायचे. पण नव्या पिढीसाठी या सगळ्या फक्त मनाला समजावण्याच्या गोष्टी आहेत. अशा परिस्थितीत या पिढीसाठी उन्हाळ्याचे दिवस अधिकच भयानक होऊ लागले आहेत. उष्णता अशीच वाढत राहिल्यास शेतीवर विपरीत परिणाम होऊन अन्नधान्य उत्पादनात घट होईल. गेल्या दोन वर्षांमध्ये त्याचा गव्हाच्या उत्पन्नावर वाईट परिणाम दिसून आला. या परिस्थितीमुळे लोकसंख्येच्या मोठ्या भागाला उपासमारीचा सामना करावा लागू शकतो. अभ्यासात आढळून आले आहे की, तापमानवाढीमुळे जगातील काही भागात दुष्काळ वाढत आहे, वाळवंट पसरत आहे. असे झाल्यास स्थलांतर करावे लागणार्यांची संख्या जगभर वाढेल यात शंका नाही. जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार आहे.
जगाचे तापमान याच वेगाने वाढत राहिल्यास हिमनद्या अधिक वेगाने वितळतील. त्यामुळे समुद्रकिनारी वसलेल्या शहरांच्या मोठ्या भागाला धोका निर्माण होईल. यापैकी बहुतेक शहरे व्यापार आणि व्यवसायाची मोठी केंद्रे आहेत. म्हणजेच त्यांच्या भौगोलिक रचनेवर विपरित परिणाम झाल्यास त्या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेवरही विपरित परिणाम होईल. हरितगृह वायू पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो आणि येथील तापमान वाढवणारा एक महत्त्वपूर्ण घटक बनतो. शास्त्रज्ञांच्या मते, या वायूंचे उत्सर्जन असेच सुरू राहिल्यास एकविसाव्या शतकात पृथ्वीचे तापमान तीन अंशांवरून आठ अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. असे झाल्यास परिणाम अत्यंत घातक होतील. जगाच्या अनेक भागांमध्ये बर्फाचे आवरण वितळेल, समुद्राची पातळी अनेक फुटांपर्यंत वाढेल. साहजिकच जगातील अनेक भाग पाण्याखाली जातील आणि प्रचंड विद्ध्वंस होईल. हा विद्ध्वंस महायुद्धामुळे किंवा एखादा ‘लघुग्रह’ पृथ्वीवर आदळल्यानंतर झालेल्या विद्ध्वंसापेक्षा कित्येक पटींनी जास्त असेल. ही परिस्थिती पृथ्वीसाठीदेखील हानिकारक असेल. त्यामुळेच ‘ग्लोबल वॉर्मिंग’ थांबवण्यासाठी जागरूकता राहण्याखेरीज कोणताही उपाय नाही. याबाबत जनजागृती करूनच लढता येईल.
आपल्याला पृथ्वी खर्या अर्थाने ‘हिरवी’ करायची आहे. त्यासाठी आपल्याला आपले ‘कार्बन फूटप्रिंट्स’ (प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जन मोजण्याचे परिमाण) कमी करावे लागेल. आपण सभोवतालचे वातावरण जितके प्रदूषणमुक्त ठेवू तितकी पृथ्वी वाचवण्याची भूमिका समर्थपणे निभावू. त्यामुळे हरितगृह वायू उत्सर्जन कमी होईल आणि उष्णकटिबंधीय वाळवंटातील आर्द्रता वाढेल असा विश्वास आहे. मैदानी भागात इतिहासात कधी नव्हती इतकी उष्मा असेल. त्यामुळे विविध प्रकारचे प्राणघातक आजार उद्भवतील. थोडक्यात, आपले अस्तित्व संपवण्याकडे झुकण्याइतका राग निसर्गाला येऊ नये, याची काळजी आपणच घ्यायला हवी. आज आपल्यातील प्रत्येकजण पर्यावरणाबद्दल बोलतो. प्रदूषण रोखण्याच्या उपायांचा विचार करतो.
लोकांना स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरणात राहण्याची गरज पटली आहे. आपल्या जबाबदार्या आणि हक्कांची जाणीव होऊ लागली आहे. सध्या जग ग्लोबल वॉर्मिंगच्या प्रश्नांनी ग्रासले आहे. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये शास्त्रज्ञांनी प्रयोग आणि शोध लावले आहेत. त्यांच्या मते, प्रदूषणाचा दर असाच वाढत राहिला तर पुढील दोन दशकांमध्ये पृथ्वीचे सरासरी तापमान दर दशकात 0.3 अंश सेल्सिअस या वेगाने वाढेल; ते चिंताजनक आहे. त्यामुळेच आता विचार नव्हे तर कृती करण्याची वेळ आहे.