। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयात कर्मचारी यांची कमतरता असल्याने जवळपास पाचशे मोजणी अर्ज गेले तीन महिन्यापासून प्रलंबित असल्याने शेतकर्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. फक्त दोन सर्व्हे कर्मचारी कार्यालयात सध्या कार्यरत असून एकूण सात जागा रिक्त असल्याने मोजणी अर्जाचा डोंगर झाला असून कामे होत नसल्याने या कार्यालयात रोजच बाचाबाची होण्याचा प्रसंग होत आहे.
भूमी अभिलेख कार्यालयातून संपूर्ण तालुक्याचा मोजणी अथवा शेत जमिनी संदर्भात कामे केली जातात. तालुक्याचा विस्तार खूप मोठा असल्याने या कार्यालयात मोजणीचे दर महिन्याला साधारणतः दीडशे अर्ज तरी येत असतात. तसेच नक्कल प्रत काढण्यासाठी साधारण दोनशे अर्ज येतात. मात्र गेल्या तीन चार महिन्यापासून या कार्यालयातून अर्जाचा निपटारा न झाल्याने आजच्या तारखेस एकूण पाचशे अर्ज मोजणी कामाचे प्रलंबित असून तेवढेच अर्ज नक्कलेसाठी प्रलंबित आहेत. यामुळे या कार्यालयात येणार्या शेतकर्यांना नुसत्या फेर्या मारावे लागत असून त्यांची कामेच होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. रोज या कार्यालयात कर्मचारी आणि शेतकरी यांच्या बाचाबाची, खटके उडत आहेत. ग्रामीण भागातून लांबून येणारा शेतकरी शंभर दोनशे रुपये खर्च करून या कार्यालयात आल्या नंतर त्याचे काम होत नसल्याने बर्याच वेळा मनस्ताप होवून वाद विवाद होत आहेत.
कर्जत भूमी अभिलेख कार्यालयात सध्या फक्त दोन कर्मचारी मोजणी कामासाठी नियुक्त असून त्यातील एकवार छाननी लिपिक तसेच आवक-जावकची सुद्धा जबाबदारी दिली असल्याने फक्त एकच कर्मचारी मोजणी कामासाठी जात असल्याने एकूण पाचशे मोजणी चे प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत.पूर्वी या कार्यालयात एकूण नऊ मोजणी कर्मचारी नियुक्त जाते. परंतु कोणाची बदली तर कोण निवृत्त झाल्याने ही पदे अनेक महिन्यापासून रिक्त असल्याने या अडचणी निर्माण झाल्या आहेत.