एसटी कर्मचार्यांची बंदमधून माघार
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान ठेऊन जिल्ह्यातील सर्व एसटी कर्मचारी कामावर हजर होणार आहेत. गेले 5 महिने 10 दिवस बंद असलेली एसटीची सार्वजनिक वाहतूक 100 टक्के सुरू होणार आहेत. मात्र काही कर्मचार्यांची बडतर्फीबाबत अपिल, तसेच मेडिकलसंदर्भात स्पष्ट आदेश नसल्याने कर्मचार्यांची अडचण झाली आहे. एसटी प्रशासनाने यावर तोडगा काढवा, अशी एसटी कर्मचार्यांनी मागणी आहे. वाहतूक सुरू करण्यासाठी एसटी प्रशासनही सज्ज झाले आहे.
पाच महिन्याहून अधिक कालावधीसाठी सुरू असलेला एसटी कर्मचार्यांचा बंद न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून मागे घेण्यात आला आहे. आज 51 कर्मचारी नव्याने हजर झाल्याची माहिती रत्नागिरी एसटी विभागाकडून देण्यात आली. विलिनीकरणावर कर्मचारी ठाम असल्याने हा बंद लांबला होता. शासनाने नेमलेल्या समितीनेही विलिनीकरण शक्य नसल्याचा अहवाल दिला. त्यानंतर न्यायालयानेही विलिनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट करीत एसटी कर्मचार्यांनी 22 एप्रिलपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कर्मचारी हजर होत आहेत. काही कर्मचार्यांवर बडतर्फीची कारवाई झाली आहे. एसटी कर्मचार्यांनी हा विषय जास्त ताणून न धरता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान ठेऊन कामावर हजर होण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे गेले पाच महिने बंद असलेली लालपरी पुन्हा एकदा धावू लागली आहे.
न्यायालयाने विलिनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट करून पगारवाढ देण्यात येईल, त्यामुळे कोणतीही कारवाई न करता हजर करून घ्या, असे सांगितले. त्यामुळे बडतर्फी आणि कारवाई झालेल्या कर्मचार्यांचे अपिल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर काही कर्मचार्यांनी वैद्यकीय तपासणी करून हजर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यासाठी एसटी प्रशासनाने स्पष्ट काय ते आदेश द्यावेत, आयत्या वेळेला वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले आणि 22 पर्यंत जर प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर त्या कर्मचार्याचे काय हे देखील एसटी प्रशासनाने सांगावे, अशी मागणी एसटी कर्मचार्यांनी केली आहे. संपातून माघार घेत एसटी कर्मचारी हजर होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पाच महिन्याहून अधिक बंद असलेली सार्वजनिक एसटी वाहतूक सोमवारपासून 100 टक्के सुरू होणार आहे. एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी ही माहिती दिली. आजपर्यंत 60 कर्मचार्यांनी अपिल अर्ज दाखल केला आहे.