अनलॉक रायगड आता खरोखरच बहरु लागलाय.दोन वर्षे कोरोना साथीमुळे कुलूपबंद झालेल्या रायगडसह संपूर्ण कोकणाचे अर्थचक्रच पूर्णपणे थंडावलेले होते. नेहमी पर्यटकांच्या येण्याजाण्याने बहरणारे कोकण मध्यंतरीच्या दोन वर्षाच्या कालखंडात थंडच पडलेले होते.पर्यटनावर अवलंबून असलेल्या शेकडो हातांचा रोजगारच या कोरोनाच्या साथीने हिरावून घेतला आहे. त्यात भरीस भर म्हणून की काय निसर्ग, तौक्ते चक्रीवादळाचा तडाखाही परशुरामाच्या भूमीला बसला आणि हाहाकार उडवून गेला. त्यातून सावरत कोकणी माणसाने पुन्हा नव्या दमाने आपला व्यवसाय सुरु केला. पण दुर्दैवाने पुन्हा कोरोनाची साथ वाढू लागल्याने पुन्हा एकदा निर्बंधाला सामोरे जावे लागले. पण दोन, तीन महिन्यात कोरोनाची साथ आटोक्यात येताच सरकारनेही कुठल्याही प्रकारचे निर्बंध न घालता सारे अनलॉक करुन टाकले आणि सार्यांनाच मोठा दिलासा दिला. त्या अनलॉकमुळे थंडावलेले पर्यटन पुन्हा बहरु लागलेले आहे. आणि त्याचीच पर्यटनावर अवलंबून असलेल्या शेकडो छोट्या, मोठ्या व्यावसायिकांना प्रतीक्षा होती. गेल्या महिनाभरापासून रायगडसह कोकणातील पर्यटन स्थळांकडे जरा बारकाईने पाहिले तर खरोखरच ती पर्यटन स्थळे आता जिवंत वाटू लागली आहे. समुद्र किनार्यांवर पर्यटकांची जणू भरतीच आल्याचा भास जाणवतोय. हॉटेल्स, धाबे, घरगुती खानावळीमध्ये ताज्या म्हावर्याचे पदार्थ बनविले जात आहेत.त्यावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांनाही पुरेशी रोजीरोटी मिळू लागली आहे. त्यामुळे त्यांची चूलही आता पेटू लागली आहे. एका दृष्टीने निश्चितच उभारी मिळू लागली आहे. ही उभारी यापुढेही अशीच टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. कारण अजूनही कोरोना पूर्णपणे नष्ट झालेला नाही. सध्या चीनमध्ये काही प्रांतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट निर्माण झाल्याने त्याचा प्रादुर्भाव तेेथे वाढू लागला आहे. याची गंभीर दखल घेत केंद्रीय आरोग्य विभागानेही सर्व राज्यांना पुन्हा सतर्क राहण्याचे फर्मान सोडलेले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही सावधान, कोरोनाची नवी लाट दारावर टिकटिक करीत असल्याचे सूचक विधान केलेले आहे. याचाच अर्थ आपण सर्वांनीच सावध राहणे गरजेचे आहे.सरकारने निर्बंध शिथिल केले असले तरी काही मुलभूत सवयी अंगवळणी लावून घेण्याचे निर्देशही दिलेले आहेत. त्यामध्ये कुठेही बाहेर जाताना वा फिरताना मास्क लावणे बंधनकारकच असल्याचे विविध माध्यमातून निर्देशित केलेले आहे. तरीही आपण सारेजण त्याकडे दुर्लक्ष करुन विनामास्क फिरत असतो.त्यातून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. रुग्णवाढ झाली की ती रोखण्यासाठी सरकारला पुन्हा मागच्याच उपाययोजना राबविणे भाग पडते. हे दुष्टचक्र थांबवायचे असेल तर सरकारी सुचनांचा सर्वांनीच अवलंब केला पाहिजे. चीनसह काही युरोपीय राष्ट्रांमध्ये निर्माण झालेल्या नव्या व्हेरिएंटमुळे पुढील दोन आठवडे भारतासाठी धोक्याची आहेत. संभाव्य धोका रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणाही सतर्क झालेली आहे. मुंबईसारख्या महानगरांमध्ये तर आतापासूनच एक लाख खाटांची सोय करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरावर तर सर्वच कोविड सेंटरना आवश्यक तो साधनसुविधांचा पुन्हा पुरवठा करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधित लसीकरणही जोरात सुरु आहे. आता तर लहान मुलांचे लसीकरण सरकारने हाती घेतले आहे. ज्यांचे दोन्ही डोस झालेले आहेत अशांना बुस्टर डोसही दिला जात आहे. जेणेकरुन संभाव्य साथीला आपण सारेजण समर्थपणे तोंड देऊ शकू. चौथी लाट आली तर ती फार सौम्य असेल असा दावाही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी वेळोवेळी व्यक्त केला असला तरी आपण सार्यांनी गाफिल राहून चालणार नाही कारण पहिल्या दोन लाटेच्या वेळी आम्हाला काय होतेय, असे म्हणत बसलो अन कोरोनाने पाय पसरले होते. त्यात आपल्याच जीवाभावाची माणसं आपल्याला कायमची पारखी झाली. त्यामुळे आता सावध राहणेच क्रमप्राप्त ठरणार आहे. तब्बल दोन वर्षानंतर सुरु झालेले अर्थचक्र आणखी गतिमान झाले तरच आपण मागील दोन वर्षातील झालेला तोटा अहोरात्र कष्ट करुन कसाबसा भरुन काढू शकणार आहोत. जर त्यात पुन्हा लॉकडाऊन, कडक निर्बंध आले तर मात्र आहे तेे नुकसान भरुन काढण्याऐवजी आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी सरकारने वेळोवेळी केलेले नियम पाळणे, जे पाळणार नाहीत त्यांना ते समजावून सांगणे क्रमप्राप्त ठरणार आहे. तरच आपला रायगड बहरत राहणार आहे हे ध्यानात ठेवणे उचित ठरेल.