। गुहागर । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रातील नेत्यांच्या पाठी शुक्लकाष्ठ लावण्याचे काम केले जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही भाजपचा हा हैदोस संपवायचे काम फक्त शिवसैनिकच करू शकतो. तेव्हा येणार्या निवडणुकीत भाजपचे गावागावातील राजकीय अस्तित्व संपवा, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केले. पालपेणे येथे जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या कार्यअहवाल पुस्तिका प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार जाधव यांनी भाजपवर घणाघाती हल्ला केला. ते म्हणाले, भाजप नेत्यांवर टीका केली की ईडी, सीबीआय आदीचा ससेमिरा लावला जातो. मात्र, त्यांना एखादी नोटीस पाठवली की, आम्ही सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप होतो. गेल्या 28 वर्षांच्या राजकारणात कधी ईडीचा शब्द ऐकायला मिळाला नव्हता. पण आज सातत्याने देशात हे शब्द ऐकायला येतात. महाराष्ट्रात प्रताप सरनाईक, संजय राऊत, अजित पवार, हसन मुश्रीफ, अविनाश भोसले, अनिल परब, अनिल देशमुख आदी सर्व मराठी माणसांमागे चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. मराठी माणूस सोडून अन्य कोणी वेडवाकडं वागतच नाही का, असा सवाल श्री. जाधव यांनी उपस्थित केला.
ते काम शिवसैनिकच करू शकतो
नबाब मलिकांना जेलमध्ये टाकून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. दाऊदशी संबंध लावला जातोय. नवाब मलिकांच्या वडिलांनी भंगारासाठी 1973 मध्ये जमीन घेतली होती. तेव्हा दाऊद उदयाला आला नव्हता. त्यांचा व्यवहार 2003 मध्ये नवाब मलिक यांनी पूर्ण केला. बॉम्बस्फोट 1993 मध्ये झाले. त्या केसमध्ये कुठेही संशयित म्हणूनही नवाब मलिकांचे नाव नव्हते. तरीही गेले 8 महिने मलिक भाजप नेत्यांविरुद्ध बोलत असल्याने त्यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांना अटक केली जात आहे.
महाराष्ट्रातील नेत्यांच्या पाठी शुक्लकाष्ठ लावण्याचे काम केले जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. त्यांची दादागिरी मोडून काढण्याचे काम शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिकच करू शकतो. – आ.भास्कर जाधव