देगाव आदिवासी वाडीतील शेकडो ग्रामस्थांचा प्रवेश
| माणगाव | प्रतिनिधी |
सर्वसामान्य लोकांचा विश्वास आमच्यावर असून, शेकाप संपला म्हणणार्यांना आपली ताकद आगामी निवडणुकांत दाखवून देऊ, असे प्रतिपादन माजी आ.पंडित पाटील यांनी माणगाव येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
देगाव आदिवासी वाडीयेथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणार्या ग्रामस्थांनी माणगाव कुणबी भवन येथे शनिवारी (17 सप्टेंबर) कार्यक्रमात पंडित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकापत जाहीररीत्या प्रवेश केला. यावेळी जेष्ठ नेते अस्लम राऊत, तालुका चिटणीस रमेश मोरे, म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य नामदेव शिंदे, माणगाव तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाचे सभापती निलेश थोरे, तालुका सहचिटणीस राजेश कासारे, देगावचे माजी सरपंच दिनेश गुगळे, सुरव तर्फे तळे माजी सरपंच सखाराम जाधव, कोलाड माजी सरपंच श्री.महाबळे, कुर्डुसचे माजी सरपंच संदीप पाटील, हसनमिया बंदरकर, नितीन वाघमारे, युवानेते स्वप्नील दसवते, निजाम फोपळूणकर, मोर्बा माजी उपसरपंच अमोल मोहिते, रुपेश मोरे आदींसह कार्यकर्ते व प्रवेशकर्ते पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंडित पाटील पुढे म्हणाले, श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील माणगाव, रोहा, तळा, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यात शेकापची आजही 40 हजार मतदार आहेत. शेकाप हा गोरगरीब जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढत आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शेकापला घेतल्याशिवाय कोणालाही यश प्राप्त करता येणार नाही. रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असून रोहा, महाड, चिपळूण, निजामपूर याठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. या वसाहतीतील भंगारावर सर्वांचा लक्ष आहे. मात्र महामार्गाच्या झालेल्या दयनीय अवस्थेकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. वडखळ पासून माणगाव पर्यंत येताना लोकांचे कंबरडे मोडत आहेत.अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पनवेल ते इंदापूर पर्यंतच्या रस्त्याला 10 ते 12 वर्ष होऊनही या रस्त्याचे काम अद्याप मार्गी लागलेले नाही.अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यंतरी माणगावला येऊन अर्धवट रस्त्याच्या कामाचे उदघाटन केले.त्यांनी पनवेल ते इंदापूर गाडीने प्रवास करावा म्हणजे त्यांना या मार्गावरून जाणार्या सर्वसामान्य जनतेचे दुःख लक्षात येईल. या रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे झाले पाहिजे. ठेकेदार व सरकारचा वाद तात्काळ निकाली काढून या रस्त्याचे काम जलद गतीने करावे तसेच माणगावमध्ये सततची होणारी वाहतूक कोंडी यासाठी माणगावमधून बायपास काढावा,
पंडित पाटील, शेकाप नेते
देगाव आदिवासीवाडीतील विविध विकासकामे अस्लम राऊत, रमेश मोरे , जिल्हा परिषद सदस्या आरती मोरे यांच्या प्रयत्नांनी शेकापने केली. आदिवासीवाडीतील पिण्याच्या पाण्याची योजना मी आमदार नाही, मंत्री नाही तरी देखील लवकरच ती पूर्ण करू. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवशी दिनी रमेश मोरे यांनी हा पक्षप्रवेश सोहळा घेतल्याने मी रमेश मोरेंना तसेच त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देतो. शिवाय ज्यांच्यामुळे हा पक्षप्रवेश सोहळा घडून आला ते देगावचे माजी सरपंच दिनेश गुगळे व नितीन वाघमारे यांनाही धन्यवाद देतो. असे ते म्हणाले.
तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना सांगितले कि, आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा दिवस असून देगाव आदिवासीवाडीतील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शेकापत जाहीररीत्या प्रवेश केल्याने सर्व प्रवेशकर्त्यांचे मी पक्षात स्वागत करतो. या आदिवासीवाडीतील विविध विकासाची कामे प्रलंबित होती. याठिकाणी आपण दहा लाखाचा रस्ता केला. पुढील रस्त्याचे कामही लवकरच मार्गी लावू. तसेच याठिकाणी सुबक अशी नवीन अंगणवाडीची इमारत उभारली. अशा प्रकारे येथील ग्रामस्थांचा शेकापने विकासकामांबाबत विश्वास संपादन केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अस्लम राऊत, निलेश थोरे, शेकाप नामदेव शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गायकवाड यांनी तर शेकापचे तालुका सहचिटणीस राजेश कासार यांनी सर्व उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांचे आभार मानले.