विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम
| अलिबाग | प्रतिनिधी |
मराठा नोंदीची माहिती घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा भार सोपविण्यात आला आहे. आठ दिवसांत हे काम पूर्ण करण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, जाचक नियमावलीमुळे हे काम वेळेवर पूर्ण होण्याची चिंता शिक्षकांनी व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असून, शाळांच्या पटसंख्येवरसुद्धा होतो. पण, शिक्षण विभाग याबाबत अनभिज्ञ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मराठा समाजाची माहिती सरकारला तातडीने देण्यासाठी रायगड प्रशासनाने जिल्ह्यातील शिक्षकांवर सर्वेक्षणाचे काम सोपविले आहे. तालुकास्तरावर शिक्षकांची माहिती घेऊन त्या नोंदीचे काम 23 जानेवारीपासून सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अलिबागसह पेणमध्ये दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यातील तीनशेहून अधिक शिक्षकांची नेमणूक केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, प्रजासत्ताक दिनाची तयारी, शाळेत गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेले वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम तसेच अकालनीय मूल्यमापन, अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनामुळे फरपट होण्याची भीती शिक्षकांनीच व्यक्त केली आहे. गृहभेटीद्वारे ही माहिती ऑनलाईन भरायची आहे. त्यात मराठा नोंदीसाठी 160 कॉलम व इतर जातीसाठी 60 कॉलमचा समावेश त्या ॲपमध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक शिक्षकाला आठ दिवसांत दोनशे कुटुंबांचे टार्गेट दिले आहे. परंतु, ते आठ दिवसांत, म्हणजे 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करणे अशक्य असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले आहे. ऑनलाईनद्वारे माहिती गोळा करताना तांत्रिक अडचणींबरोबरच बंद असलेल्या घरांची माहिती घेताना शिक्षकांना अडचण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सर्वेक्षणासाठी मुदत वाढविण्याची मागणी 23 ते 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षणाचे काम केले जाणार आहे. या कालावधीत काम करताना शिक्षकांना पुरेसा वेळ मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यात विद्यार्थ्यांनादेखील शिक्षकविण्यासाठी वेळ देण्यास अडथळे निर्माण होणार आहेत. त्यामुळे सर्वेक्षणाची मुदत वाढविण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
उच्चशिक्षित तरुणांकडे काम द्या
सर्वेक्षण करताना शिक्षकांना अनेक अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे नुकसान होणार नाही याचा विचार करणे आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यात गावागावात उच्च शिक्षित तरुण आहेत. नोकरी नसल्याने ते बेरोजगार आहे. या सर्वेक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविल्यास त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध होईल. तसेच जिल्हा परिषद शिक्षकांसह अन्य विभागातील शिक्षकांनादेखील सर्वेक्षणामध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी केली आहे.
शिक्षणाधिकारी अनभिज्ञ रायगड जिल्ह्यातील शिक्षकांची सर्वेक्षणासाठी प्रशासनाने निवड केल्याबाबत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. तालुकास्तरावर माहिती घेतल्याने त्याची माहिती जिल्हा कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
सर्वेक्षणाचे काम आठ दिवसांत पूर्ण होणे शक्य नाही. शिक्षकांच्या आवाक्याबाहेरचे काम आहे. एका दिवसात दोनशे कुटुंबांचा सर्वे करताना शिक्षकांची मोठी दमछाक होणार आहे. त्यामुळे त्यांना स्वतःबरोबरच विद्यार्थ्यांकडे वेळ देता येणार नाही. त्यामुळे सरकारने मुदत वाढवून द्यावी. 26 जानेवारीनंतर हा कार्यक्रम सुरु करावा, अशी मागणी होत आहे.
राजेंद्र म्हात्रे, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, रायगड
मराठा नोंदीचे सर्वेक्षण आठ दिवसांत पूर्ण करण्यासाठी शिक्षकांची निवड केली आहे. परंतु, किती शिक्षकांची निवड केल्याची माहिती नाही. या कालावधीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे.
सुनील भोपळे, उपशिक्षणाधिकारी,
रायगड जिल्हा परिषद