शिवसंपर्क अभियानास अत्यल्प उपस्थिती
। महाड । प्रतिनिधी ।
शिवसेनेच्यावतीने शिवसंपर्क अभियानाद्वारे महाड येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाड शिवसेनेला मरगळ आल्याचे आ.भरत गोगावले यांनी कबुल केले. ज्यांना संघटनेशी कामे करावयाची नसतील त्यांनी कोणतीही मागणी घेऊन आपल्याकडे येऊ नये असा सूचक इशारा दिला. यावेळी खा.राजन विचारे, संपर्क प्रमुख सदानंद थरवळ, जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, युवा सेना जिल्हा अधिकारी विकास गोगावले, तालुका प्रमुख सुरेश महाडीक यावेळेस उपस्थित होते. आगामी निवडणुकीकरिता राजकारणाचा पाया असणारी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद ही एकजुटीने विजयी होण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे असे आवाहन खा.विचारे यांनी केले.
आ. भरत गोगावले यांनी आजच्या शिवसंपर्क अभियानाला महाडमधील असलेली शिवसैनिक व संबंधितांची उपस्थिती बघता संघटनेला मरगळ आली आहे असे स्पष्ट संदेश देऊन ही मरगळ झटकावी लागेल असे सांगतानाच ज्यांना संघटनेशी कामे करावयाची नसतील त्यांनी कोणतीही मागणी घेऊन आपल्याकडे येऊ नये असा सूचक इशारा दिला. संपर्कप्रमुख सदानंद थरवळ यांनी तीस वर्षांपासून महाड नगरपालिकेमध्ये भगवा न फडकण्याचे कारण आपापसातील मतभेद व तंगड्या ओढण्याचे काम असल्याचे सांगितले. जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी आगामी निवडणुकीमध्ये मतदार नोंदणी वाढ ही महत्त्वाची असून या संदर्भात संघटनेने दिलेल्या गटप्रमुख वरील असलेली जबाबदारी महत्त्वाची असल्याचे सांगितले.
युवासेनेचे जिल्हाअधिकारी विकास गोगावले यांनी आम्ही विधानसभा क्षेत्रात आघाडी टिकविण्याची कामे करीत असताना राष्ट्रवादीकडून ही आघाडी बिघडवण्याचे काम केले जात असल्याचेही निदर्शनास आणले. गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरूच असून विरोधकांची अवस्था ना घरका ना घाटका करण्याकरिता संघटनेच्या नेत्यांनी आवश्यक असणारी रसद व ताकद पुरवावी अशी मागणी केली. राजिप सदस्य मनोज, काळिजकर रघुवीर देशमुख, नितीन पावले यांनी देखील शिवसंपर्क अभियानासंदर्भात तसेच आगामी काळात येणार्या निवडणुकांसंदर्भात आपले समयोचित विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन नितीन पावले यांनी केले.