आपत्कालीन स्थितीसाठी नगरपालिका सज्ज
। महाड । प्रतिनिधी ।
मोसमी पाऊस जसजसा समिप येऊ लागला आहे तसतशी महाडकरांच्या मनात धास्ती निर्माण होऊ लागली असून,गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही असेच नैसर्गिक संकट उद्भवले तर काय सावधानता बाळगायची याचा सर्वजण गांभीर्याने विचार करु लागले आहेत.
महाड नगरपालिका प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन बैठक पार पडली. या वेळी उपस्थित नागरिकांनाही माहिती देण्यात आली. नगरपालिकेने सुमारे दहा लाख रुपयांचा निधी आपत्ती निवारण काळासाठी राखीव ठेवल्याचे सांगून आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाकडून अत्यावश्यक असणारी साधन सामग्री व मदत कार्यासाठी बोटींची मागणी केल्याचेही मुख्याधिकार्यांनी स्पष्ट केले. महाड शहराच्या नदीपात्रालगत राहणार्या नागरिकांसाठी शहरात सेहेचाळीस ठिकाणी इमारती आरक्षित केल्या असून या ठिकाणी नागरिकांना शासनाने सूचना दिल्यावर तातडीने स्थलांतरित व्हावे लागणार आहे. या ठिकाणी स्थलांतरित होणार्या नागरिकांना जेवणाची व्यवस्था प्रशासनामार्फत केली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मागील वर्षी 22 जुलैला आलेल्या महापुरानंतर पालिकेने स्थलांतरित करावयाच्या नागरिकांचा अंदाज केला असून या अनुषंगाने सेहेचाळीस इमारती, तसेच शहरातील असणार्या नगरपालिकेच्या शाळा व संबंधित समाजमंदिरातदेखील अत्यावश्यक प्रसंगी निवार्याची व्यवस्था केली जाणार आहे.
महाड शहरात दरवर्षी येणार्या पुराच्या व गतवर्षी आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी महाड नगरपालिका प्रशासन सज्ज असून नगरपालिकेच्या प्रशासकीय भवनात महाड महसूल विभाग, पोलिस व नगरपालिकेचा एकत्रित नियंत्रण कक्ष एक जूनपासून सुरू केला जाणार आहे.
– महादेव रोडगे, मुख्याधिकारी
दहा लक्ष रुपयांचा निधी राखीव
आपत्तीकाळात नगरपालिकेने तातडीने आर्थिक तरतूद व्हावी या उद्देशाने सुमारे दहा लक्ष रुपयांचा निधी राखीव म्हणून ठेवला आहे. नगरपालिका प्रशासकीय भवन तसेच अन्य एका ठिकाणी सायरनची व्यवस्था केली जाणार असून त्या माध्यमातून नागरिकांना पूरस्थितीची सूचना दिली जाईल. तसेच जून ते सप्टेंबर महिन्यात येणार्या भरती-ओहोटीची माहितीही नागरिकांना जाहीर फलकाद्वारे दिली जाणार आहे.
आपत्कालीन मदत प्रशिक्षण
महाडमध्ये चार ते पाच प्रभागांतील नागरिकांना आपत्कालीन मदत प्रशिक्षण देण्यात आले असून यानंतरही आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या आपत्तीकाळात काम करणार्या व मदत करणार्यांचा विमा नगरपालिकेमार्फत काढण्यात येणार आहे. गतवर्षी आलेल्या महापुरात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हे नुकसान टाळण्यासाठी शहराबाहेर काही ठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. पूरपरिस्थितीमध्ये नागरिकांनी या ठिकाणी आपली वाहने पार्क करावी, असे आवाहनही पालिकेने केले आहे.