। महाड । प्रतिनिधी ।
पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. हिंमतराव बावस्कर यांचा महाडवासियांच्यावतीने सत्कार करण्यात आला. महाडकरांची आपल्याला मिळालेली साथ या पुरस्कारासाठी मोलाची असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. संजय ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत साजर्या झालेल्या या सत्कार सोहळ्यास महाडमधील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सहभागी झालेल्या होत्या. यावेळी खा.सुनिल तटकरे,आ.भरत गोगावले, शोभा सावंत, किशोर धारिया,संजय भुस्कुटे,डॉ. रमेश नाईक उपस्थित होते. महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप या सोहोळ्याच्या स्वागताध्यक्ष होत्या. यावेळेस डॉ. हिम्मतराव बावस्कर आणि डॉ. प्रमोदिनी बावस्कर यांना सन्मानित केले.
कोणत्याहि क्षेत्रात पुढे जायचे असेल तर संशोधनाला पर्याय नाही. एका ध्येयाने संशोधन कार्य करणार्याला आपण ग्रामीण भागातून आल्याची भाषेची, पैशांची फेलोशीपची आवश्यकता नसते हे डॉ. बावस्कर यांनी आपल्या संशोधन कार्याने सिध्द करुन दाखविले असल्याचे ते म्हणाले. खा. सुनील तटकरे यांनी, डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी विंचू दंशावरील उपचार पध्दतीसह, वैद्यकीय क्षेत्रात विविध विषयांवर केलेले संशोधन कार्य हे दीपस्तंभासारखे असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. आ.भरत गोगावले यांनी, डॉ.बावस्कर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा जसा त्यांच्या संशोधन कार्याचा गौरव आहे. तसाच त्यांच्यातील जिद्द आणि चिकाटीचाही गौरव असल्याचे सांगितले. स्वागताध्यक्ष जगताप यांनी, डॉ. बावस्कर यांची कर्मभूमी महाड आहे, याचा आपल्यासह तमांम महाडकरांना अभिमान असल्याचे सांगितले. किशोर धारिया, डॉ.चंद्रशेखर दाभाडकर, संजय भुस्कुटे, शोभाताई सावंत यांचीही डॉ. बावस्कर यांच्या गौरवपर भाषणे झाली.
सत्काराला उत्तर देताना डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी महाडकरांची आपल्याला मिळालेली साथ या पुरस्कारासाठी मोलाची असल्याचे सांगत, महाडकरांप्रती आपला आदरभाव व्यक्त केला. मूलभूत संशोधनासाठी पैशांची नव्हे, तर बुध्दीची आवश्यकता असते, असे ते म्हणाले.