मात्र, इंडियाच्या फिल्डींगने चिंता वाढवील
| रायगड | आविष्कार देसाई |
लोकसभा मतदार संघातील मुस्लिम बहुल पट्ट्यातील मत्ताधिक्य मिळेल अशी अपेक्षा भाजपासह महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना आहे. परंतू आधीच तगडी फिल्डींग लावल्याने अनंत गीते येथून मुसंडी मारतील असा विश्वास इंडिया आघाडीला आहे. (दि.4) जून रोजी निकाल जाहीर होणार असल्याने खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
सुनील तटकरेंपेक्षा भाजपाने रायगड लोकसभेची निवडणूक अधिक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील महत्वाच्या नेत्यांनी प्रचारात चांगलाच धुरळा उडवला. गेल्या पाच वर्षात कोणती विकास कामे करण्यात आली. याबाबत भाजपा आणि तटकरे बोलले नाहीत. बेरोजगारी, महागाई, रेल्वेचा प्रश्न, रखडलेला मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न यावर महायुतीच्या नेत्याने ठोस काही करणार असल्याचे सांगितले नाही. मोदी सरकार हे कष्टकरी, शेतकरी, तरुण, दलीत, मुस्लिम यांच्या विरोधात असल्याचे विविध धोरणातून स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे नेते नसिम खान यांच्यासह अन्य नेते मतदारांच्या मनात हाच मुद्दा बिंबवण्यात यशस्वी झाले होते.
भाजपाच्या कार्यप्रणालीमुळे मराठा, ओबीसी, दलीत आणि मुस्लिम समाजात कमालीची नाराजी होती. या घटकांबरोबर मुस्लिम समाजामध्ये मोदी राजवटीची चांगलीच दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे मोंदींना पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखणे गरजेचे असल्याचे त्यांनी मुस्लिम समाजाने हेरले होते. त्यातच पेण येथील सुनील तटकरेंच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर चांगलाचा बॉम्ब टाकला. तटकरेंना मत म्हणजे मोदींना मत असे सांगितले. या एका वाक्याने मुस्लिम समाज चांगलाच सर्तक झाला. तटकरेंना मत म्हणजे मोदींना मत, याचा वाक्याचा धागा पकडून त्यांनी मतदान यंत्रातून आपला विरोध प्रकट केल्याचे बोलले जाते. फडणवीस यांचे हेच वाक्य तटकरेंसाठी डोकेदुखी ठरणार का हे मतदानयंत्र उघडल्यावर समोर येणार आहे. रायगड लोकसभा मतदार संघात एकूण मतदारांच्या तुलनेत एक लाख 60 हजार मुस्लिम मतदार आहेत. हा मतदार या आधी काँग्रेसच्या पाठीशी होता. एक गठ्ठा मतदान होत असल्याने तत्कालीन काँग्रेसच्या उमेदवारांला विजयाची कोणतीच चिंता नसायची. पुढे काँग्रेसने हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडल्याने तो त्यांच्यासोबत काही प्रमाणात होता. त्यानंतर रायगडातील तटकरे यांची राष्ट्रवादी भाजपासोबत गेल्याने हाच मतदार तटकरेंपासून दुरवला गेल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.