14 वर्षानंतरही बायपासचे काम अपूर्णच
। माणगाव । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव व इंदापूर शहराला बाह्यवळण मार्गाची मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे तळ कोकणासह गोवा व दक्षिणेकडे जाण्याचे अंतर कमी झाल्यामुळे कोकणासह गोवादर्शन सहज घडवता येईल, अशी आशा पर्यटकांना वाटत होती. मात्र, या बाह्यवळणाचे काम वन व रेल्वे खात्याच्या मंजुरीत अडकले होते. त्यानंतर वनखात्याची मंजुरी मिळाली. मात्र, शासनाकडून वेळेवर निधी मिळत नसल्याचे कारण पुढे करीत पूर्वीच्या ठेकेदाराने हे काम सोडून दिले होते. त्यानंतर सनी इंटरप्रायजेस कंपनीकडे हे काम देण्यात आले होते. नव्या ठेकेदाराच्या कामात म्हणावी तितकी गती मिळत नसल्याने पुन्हा नव्याने तिसर्या ठेकेदाराला काम देण्यात आले. मात्र, त्यानंतरही माणगाव व इंदापूर बाह्यवळणाच्या कामाचा तिढा आजही सुटलेला नाही.
तळ कोकणासह गोव्याकडे जाणार्या नागरिकांना माणगाव बाजारपेठेत अडथळा होऊ नये म्हणून या ठिकाणी बाह्यवळण रस्ता मंजूर करण्यात आला होता. मात्र, या मार्गाचे काम गेली दहा वर्षापासून थांबले आहे. त्यामुळे माणगाव व इंदापूर बाह्यवळणाचे काम रखडल्याने दरम्यानच्या भागात सतत वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी नागरिकांची चांगलीच रखडपट्टी होत आहे. हा बाह्यवळण रस्ता वनखात्याच्या जमिनीतून व कोकण रेल्वेच्या उड्डाण पूलाच्या जागेतून जात आहे. तसेच, त्यातच काही जमिन मालकांना भूसंपादनाच्या मोबदल्याचा प्रश्नही भेडसावत आहे. त्यामुळे या बाह्यवळण मार्गाचे काम रखडले आहे.
दरम्यान, 3 एप्रिल 2022 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री यांनी इंदापूर येथील कार्यक्रमात मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्त्याचे काम एक वर्षात पूर्ण करू, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर विविध सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विधानसभा निवडणुकीपूर्वी महामार्गाची पाहणी करून बाह्यवळण व महामार्गाच्या कामाला गती देऊन नजीकच्या काळात महामार्गाचे काम पूर्ण करू, अशी ग्वाही दिली होती. मात्र, ही आश्वासने फोल ठरल्याने नुकतेच महामार्गावर आंदोलन कर्त्यांनी शिमगा साजरा केला आहे.
कोकणवासीयांत प्रचंड नाराजी
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामावर गेली अनेक वर्षे भिजत घोंगडे पडले आहे. दरम्यान, माणगावात वाहतुकीचा ताण पडत असून पर्यटक व स्थानिकांना वारंवार वाहतूक कोंडीशी सामना करावा लागत आहे. त्यासाठी माणगाव कळमजे पुलाजवळून नाणोरे गावालगत बाह्यवळण रस्त्याचे काम 2017 मध्ये सुरु करण्यात आले होते. हा बाह्यवळण रस्ता 7 कि.मी.चा असून तो माणगाव शहराच्या बाहेरून काढण्यात आला आहे. या रस्त्याचे काम केवळ 30 टक्के पुर्ण करण्यात आले आहे. अखेर शासनावर दबाव वाढत असल्याने या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून त्या कामाला आणखीन म्हणावी तितकी गती मिळत नाही. कोकणचे मुख्य प्रवेशद्वार समजले जाणार्या इंदापूर व माणगाव या महत्वाच्या शहराजवळून जाणार्या बाह्यवळण रस्त्याच्या कामाचे तीन-तेरा वाजल्याने कोकणवासीयांत प्रचंड नाराजी प्रसरली आहे.