पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांची पट संख्या घसरली
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुबंई महापालिकेच्या हिंदी, मराठी, उर्दू माध्यमांच्या 32 शाळांना अखेरची घरघर लागली आहे. पहिली ते आठवीपर्यंत एकूण विद्यार्थ्यांची संख्या पट कमी असल्याने गेल्या दहा वर्षात बोरिवली आणि भायखळा विभागातील 32 शाळा बंद करण्यात आले असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.
एकीकडे मराठी बद्दलचे उतू जाणारे राजकीय प्रेम आणि दुसरीकडे शालेय स्तरावर भाषेला लागलेली उतरती कळा या दोन्ही गोष्टी मराठी भाषेचे भविष्य किती दिवस उज्ज्वल ठेऊ शकतील, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. दुसरे म्हणजे शैक्षणिक स्पर्धेत आपली मुले मागे राहू नयेत या काळजीने पालक मराठी शाळेकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. मराठी शाळे बरोबर मराठी भाषेलाच घरघर लागल्याचे नुकतेच आपण विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी इंग्रजी भाषेत वाचून दाखवलेल्या पात्र अपात्र निकाला वेळी महाराष्ट्राने अनुभव घेतला.
राजकीय लोकच मराठी भाषेची अशी अवहेलना करीत असतील तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन सामान्य माणूस आपल्या मुलाला मराठी भाषेचे शिक्षण का बरे देईल. महापालिकेतील मराठी शाळा ओस तर पडतंच आहेत शिवाय खाजगी शाळेत सुद्धा मराठीचा ओढा कमी झाला आहे. तिथेही पालक आपल्या मुलांना मराठी शाळेतून प्रवेश काडून इंग्रजी माध्यमात प्रवेश घेत आहेत.