माथेरान अनेक समस्यांच्या गर्तेत

यंदाचा वार्षिक हंगाम पूर्णपणे डबघाईला

| माथेरान | मुकुंद रांजाणे |

मागील अनेक वर्षांपासून माथेरानमधील समस्या जैसे थेच आहेत. याठिकाणी सत्तेत कोणताही राजकीय पक्ष असो, तरी सुद्धा माथेरानचा विकास काही होत नाही. येथील रस्ते, वीज, पाणी व वाहतूक व्यवस्था याच समस्या सोडविताना सत्तेतील पाच वर्षे निघून जातात. मुख्यत्वे लोकप्रतिनिधी माथेरानच्या विकासाबाबतीत सार्वभौम विचार करत नसून अत्यल्प मतांसाठी गावाला वेठीस धरण्याची कामे करत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे. जोपर्यंत स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार नाहीत, तोपर्यंत माथेरानचा विकास होऊच शकत नाही, असे बोलले जात आहे. त्यामुळे माथेरान अन्य स्थळांच्या तुलनेत खरंच विकसनशील पर्यटनस्थळ होईल का? असा प्रश्न स्थानिकांसमोर उभा ठाकला आहे.

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध आहे. ब्रिटिश राजवटीत माथेरान हे शहर वसविण्यात आले होते. या ठिकाणचे नियम देखील वेगळे आहेत. हे ठिकाण मुंबई-पुणे पासून जवळच असल्याने या ठिकाणी असंख्य पर्यटक भेटी देत असतात. उन्हाळी सुट्टीत तर पर्यटकांची मांदियाळीच असते. परंतु, या ठिकाणी पर्यटकांना मोठ्या अडचणिंचा सामना करावा लागत आहे. त्याचा परिणाम स्थानिक व्यावसायिकांवरही होत आहे. या ठिकाणचे नियम कडक आणि वेगळे असल्यामुळे स्थानिकांना पर्यटनावरच अवलंबुन राहावे लागते. जेवढे जास्त पर्यटक तेवढी जास्त कमाई. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी विकास कामांचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. येथील राजकीय चक्रव्यूहात आणि मतांच्या राजकारणामध्ये पूर्णपणे गुंतलेल्या राजकारणी लोकांमुळे माथेरानचा विकास खुंटल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.

आतापर्यंत माथेरान नगरपरिषदेच्या सभागृहातील सत्तेच्या चाव्या ज्यांनी ज्यांनी हाती घेतल्या आहेत त्यांनी सर्वसामान्यांच्या समस्यांना न्याय न देता अधिराज्य गाजविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ‌‘हम करे वो कायदा’ याच अविर्भावात राहून त्यांनी माथेरानला या स्थळाला नावारूपाला आणण्याऐवजी समस्यांच्या गर्तेत नेऊन सोडले आहे. दर पाच वर्षांनी मतदार विश्वासाने आपल्या पसंतीच्या उमेदवाराला विजयी करून देतो. जेणेकरून सभागृहात आपल्या अडचणी व समस्या दूर व्हाव्यात, तसेच गावाचा विकास व्हावा. परंतु, काही दिवसांतच परिस्थिती जैसे थेच होते.

माथेरानमध्ये सध्या घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे श्री सदस्यांना याठिकाणी सातत्याने स्वच्छता मोहीम हाती घेण्याची वेळ येत असते. माथेरानमध्ये कोणत्याही वाहनांना परवानगी नसल्यामुळे पर्यावरण पूरक ई-रिक्षांच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्था होत असते. परंतु, या ई-रिक्षांची संख्या अत्यंत कमी असल्याने पर्यटकांसह विद्यार्थी आणि स्थनिकांची मोठी गैरसोय होत आहे. असे असतानाही ई-रिक्षांमध्ये वाढ होण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न केले जात नाहीत. ई-रिक्षांमध्ये वाढ केल्यास अन्य अत्यल्प मतदार दुखावले जातील, या हेतूने लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे. तसेच माथेरानमध्ये येणारा पर्यटक मौज मजेसह खासकरून निसर्गाच्या सानिध्यात पायी चालत वेळ घालविण्यासाठी येत असतो. परंतु, पदभ्रमण करताना दगडी रस्त्यावरून जाताना त्यांना नकोसे वाटते. तसेच, याठिकाणी जे काही ब्रिटिश कालीन पॉईंट्स निर्माण करण्यात आले आहेत, त्यांचे सुयोग्य पद्धतीने सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. अनेक पॉईंट्सवर सुरक्षित कठडे नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. निदान ठराविक महत्वाचे पॉईंट्स विकसित करून साहसी खेळ सुरू केल्यास ते पर्यटकांना आकर्षित करू शकतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या सर्व समस्यांमुळे माथेरानमधील यंदाचा व्यावसायिक हंगाम पूर्णपणे डबघाईला आला आहे. त्यामुळे स्थानिक व्यासायिक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. पावसाळ्यात तरी हंगाम बहरेल, या आशेवर ते तग धरून आहेत. त्यामुळे नव्याने नगरपरिषदेच्या सभागृहात बसलेले सत्ताधिकारी आतातरी जागे होतील का? श्रेयवाद तसेच अत्यल्प धनिक मतदारांचा विचार सोडून सर्वपक्षीय नेते सर्वसामान्यांसाठी माथेरानच्या विकासासाठी एकत्र येत एक पाऊल पुढे टाकतील का? आणि माथेरानला अन्य स्थळांच्या तुलनेत खरंच विकसनशील पर्यटनस्थळ बनवू शकतील का? असा प्रश्न माथेरानकर उपस्थित करत आहेत.

व्यावसायिक आर्थिक अडचणीत
माथेरानकरांचा वार्षिक व्यावसायिक हंगाम एप्रिल ते मे महिन्याच्या कालावधीत असतो. परंतु, सद्यस्थितीत याठिकाणी तुरळक प्रमाणात पर्यटक दिसत आहेत. बाजारपेठेत देखील शुकशुकाट असल्याने येथील व्यापारी, दुकानदार व पॉईंट्स वरील लहान मोठ्या व्यावसायिकांना अक्षरशः आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी स्थानिक व्यावसायिकांना कर्जाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे मुश्कील बनले आहे. त्यामुळे माथेरानकडे पर्यटकांनी पाठ का फिरवली आहे, याबाबत लोकप्रतिनिधींनी अभ्यास करणे गरजेचे बनले आहे.
Exit mobile version