काँग्रेस, राष्ट्रवादीची पाठ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेकापक्षाचे आमदार जयंत पाटील आणि तत्कालिन आमदार पंडित पाटील यांच्या प्रयत्नांतून अलिबाग रोहा रस्त्याला मंजुरी मिळून इ निवीदा काढण्याची कार्यवाही झाली होती. ही प्रक्रीया विद्यमान शिवसेना आमदार होण्यापुर्वी झाली असल्याचे सत्य जनतेपर्यंत पोहचल्याने आग झालेल्या शिवसेना आमदारांनी शेकापक्षावर शासकीय व्यासपिठावरुन आगपाखड करण्याचे काम केल्याने अलिबागकरांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री अदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे तसेच काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत रस्त्याचा शुभारंभ करण्याबाबत जोरदार बॅनरबाजी शिवसेनेकडून केली जात होती. मात्र यापैकी कोणीही कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने या कार्यक्रमाला शिवसेनेच्या मेळाव्याचेच स्वरुप आले होते. रस्त्यावर शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे लावले होते. मात्र प्रत्यक्षात काँग्रेसचे गोंधळी वगळता कोणीच उपस्थित नव्हते. तर राष्ट्रवादीचा देखील एकही कार्यकर्ता कार्यक्रम स्थळी फिरकला देखील नाही. त्यामुळे हे झेंडे शिवसेनेनेच लावल्याने जनतेतून खिल्ली उडविली जात होती.
या रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नसल्याचे पाहून शेकापक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेने रास्ता रोको केल्यामुळे अखेर शासनाने कामाला सुरुवात करणे भाग पडले. मात्र शेकापक्षाच्या प्रयत्नांचे खोटे श्रेय घेत हायब्रीड अॅन्युईटीतून केला जाणारा अलिबाग रोहा कणघर वावे रस्ता शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खर्चातून होणार्या नारळ फोडून आपणच काम सुरु केल्याची आवई उठविण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या भाषणात शिवसेना आमदारांनी या रस्त्याच्या कामासाठी आपणच प्रयत्न केल्याचा खोटारडेपणा दाखवून दिला.
शेकापक्षाचे आमदार जयंत पाटील आणि तत्कालिन आमदार पंडित पाटील यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 2019-20 मध्ये इ निवीदा काढली होती. हे काम मंजुर झाल्यानंतर त्याची ई निवीदा 27 मे 2019 रोजी निघाली. तेव्हा अलिबागचे आमदार म्हणून शेकापक्षाचे पंडित पाटील हे होते. शिवसेनेचे आमदार ऑक्टोबर 2019 मध्ये निवडून गेले. तर सदर निवडणून उघडण्यात आली 1 जुलै 2019. तर मग या कामाचे ते श्रेय कसे घेऊ शकतात असा सवाल जनतेतून केला जात आहे. वचनपुर्तीच्या फेका मारुन जे काम आपण केलेच नाही त्याचे श्रेय कसले घेता असा सवाल केला जात आहे. कामाचे श्रेय चुकीच्या पद्धतीने करता कामा नये. आपल्या कार्यकाळातच न झालेल्या कामाचे नारळ कसले फोडता? असा प्रश्न जनतेतू केला जात आहे.