| पनवेल | वार्ताहर |
प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या भरावामुळे पनवेलजवळील पारगाव गावात पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे पारगाव गावाच्या पुनर्वसन व पुनर्स्थापनेबाबत महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बैठकीचे आयोजन केले आहे.
गुरुवार, दि. 2 जून 2022 रोजी दुपारी महाराष्ट्र भवन सचिवालय येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, पारगाव गावात विमानतळाच्या भरावामुळे पाणी साचत असल्याने पारगाव गावाचे पुनर्वसन करावे म्हणून पारगाव गावच्या सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्या पुढाकाराने बाळासाहेब नाईक, माजी उपसरपंच मनोज राम दळवी तसेच विजय पाटील, सुनील पाटील, माजी सदस्य भालचंद्र मोकल यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना निवेदन दिले.
पारगाव गावाचे पुनर्वसन सिडको मार्फतच व्हावे ही भूमिका पारगाव ग्रामस्थांची आहे. या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, रायगडचे जिल्हाधिकारी, पनवेलचे उपविभागीय अधिकारी, पनवेल तहसीलदार तसेच पारगावच्या सरपंच उपस्थित राहणार असल्याचे समजते.