आमदार मंदा म्हात्रे कोणत्या पक्षातून निवडूक लढवणार; नवी मुंबईत भाजपला जोर का झटका

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
भारतीय जनता पक्षाकडून महिलांचा सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप करीत आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यापुढेच मंदा म्हात्रे यांनी ही खंत बोलून दाखवली आहे. त्यामुळे त्या आता कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार कि अपक्ष याबाबत राजकिय वर्तूळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

दोनदा विधानसभेवर निवडून आल्यानंतरही पक्षाकडून डावललं जात असल्याचा आरोप यावेळी मंदा म्हात्रे यांनी केला आहे. 2019 च्या निवडणुकीत आपण अपक्ष लढण्याचे संकेत पक्षाला दिले होते, असं देखील यावेळी मंदा म्हात्रे म्हणाल्या. त्याचप्रमाणे, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या कामावर निवडून आल्याचा दावा देखील मंदा म्हात्रे यांनी केला आहे.

दोनदा विधानसभेवर निवडून आल्यानंतर, कर्तृत्त्व सिद्ध करून दाखवून सुद्धा पक्षाकडून डावललं जातं असं म्हणत मंदा म्हात्रे यांनी यशोमती ठाकूर यांच्यासमोर आपल्या पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. मंदा म्हात्रे यावेळी म्हणाल्या, महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. मी पहिल्या वेळी निवडून आले तेव्हा मोदींची लाट होती म्हटलं गेलं. मी दुसर्‍यांदा देखील निवडून आले. आता तर मोदींची लाट नव्हती ना? ते माझं काम होतं, माझं कर्तृत्त्व होतं. पण महिलांनी केलेलं काम झाकून टाकायचं, त्यांच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत असे प्रकार होतात.

मंदा म्हात्रे यावेळी बोलताना पुढे म्हणाल्या कि, मी कोणालाही घाबरत नाही. मला कोणाला घाबरायची गरज नाही. मी नेहमी स्पष्टच बोलते. मला तिकीट द्या किंवा नका देऊ. मी लढणार म्हणजे लढणार. इतर पक्ष असतात ना आपल्याला साथ द्यायला. राजकारणात महिलांना यश मिळू लागल्यानंतर स्वपक्षातील नेत्यांकडूनच महिला नेत्यानेच पंख छाटले जातात, अशी खंतसुद्धा मंदा म्हात्रे यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. मात्र, आपण कधीही स्वतःला कमी समजू नये, असा सल्ला देखील यावेळी मंदा म्हात्रे यांनी दिला आहे.

Exit mobile version