| पुणे | प्रतिनिधी |
सध्या राज्यात सूर्य आग ओकत आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा 42 अंशांपेक्षा जास्त नोंदविला जात असल्याने भयंकर उकाडा जाणवत आहे. या उष्णतेसह उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी आता मान्सूनची वाट पाहात आहे. दरम्यान, येत्या (दि.22) मे रोजी मान्सूनचे देशात आगमन होत असून, तो (दि12) ते (दि.13) जूनला महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून, शेती मशागतीच्या कामांना आता जोर चढणार आहे.
महाराष्ट्रात मान्सूनचा पहिला पाऊस कधी हजेरी लावणार, पेरणीयोग्य पाऊस कधी होणार, शेतकर्यांच पेरण्या कधीपर्यंत पूर्ण होणार या संदर्भात सविस्तर माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा (दि.22) मे रोजी अंदमानात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. यंदाचा पावसाळा हा चांगला राहणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, ज्यावर्षी उन्हाळ्यात जास्त पाऊस पडतो, त्या पावसाळ्यात नेहमीच कमी पाऊस पाहायला मिळतो. गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. परंतु, यंदा उन्हाळ्यात फारसा पाऊस झालेला नाही. परिणामी, पावसाळ्यात समाधानकारक असा पाऊस होणार, असा अंदाज डख यांनी वर्तविला आहे.
पंजबाराव यांनी सांगितल्याप्रमाणे यंदा महाराष्ट्रात (दि.12) ते (दि.13) जूनच्या आसपास पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. म्हणजे 12-13 जूनला राज्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार आहे. तथापि, महाराष्ट्र पेरणीयोग्य पावसाला (दि.22) जूननंतरच सुरुवात होणार आहे. (दि.22) जूननंतर पेरणीयोग्य पावसाला सुरुवात होईल आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातल शेतकर्यांच्या पेरण्या पूर्ण होतील, असे भाकीत पंजाबरावांनी वर्तवले आहे. यंदा जुलै महिन्यात जास्तीचा पाऊस, ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस होणार असे भाकीत त्यांनी व्यक्त केले आहे. राज्यात पूर्वमौसमी पावसाला पोषक परिस्थिती तयार होत आहे. पंजाबराव डखांनी म्हटल्याप्रमाणे आजपासून अर्थातच (दि.7) मेपासून (दि.11) मेपर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पूर्वमौसमी पाऊस होईल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.