किमान तीन सामन्यांची कसोटी मालिका हवी: हॉकली

| मेलबर्न | वृत्तसंस्था |

भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया येथील क्रिकेट मंडळे तीन ते पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करतात. मात्र, अन्य देशांत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाते. किमान तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे आयोजन केले जावे. आगामी काळात दौरा कार्यक्रमात यावर काम केले गेले पाहिजे. त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा दर्जा अधिक वाढेल, असे मत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख निक हॉकली यांनी व्यक्त केले.

दक्षिण आफ्रिकेने आपल्या स्थानिक ट्वेन्टी-20 लीगला प्राधान्य देताना न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी नवोदित खेळाडूंचा समावेश असलेला संघ निवडला आहे. या मालिकेसाठी निवडलेल्या 14 पैकी सात खेळाडूंनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. ‌‘एसए20′ या दक्षिण आफ्रिकेतील ट्वेन्टी-20 लीगला 10 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे, तर आफ्रिका-न्यूझीलंड मालिकेतील सामने 4 ते 17 जानेवारी या कालावधीत खेळवले जाणार आहेत.

ऑस्ट्रेलियाची भूमिका याबाबत नेहमीच स्पष्ट राहिली आहे. बिग बॅश लीग सुरू असतानाही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य दिले आहे. मात्र, आता सतर्क होण्याची आवश्यकता आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वेळापत्रक ठरवताना अन्य मंडळांशी चर्चा करण्याचा विचार करायला हवा. जेणेकरून भविष्यात अशा अडचणी येणार नाहीत, असे हॉकली म्हणाले.

Exit mobile version