हॉटेल व्यावसायिकांना न.प.चे अभय
| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन शहरामध्ये पर्यटन व्यवसाय हा एक नंबरचा व्यवसाय ठरू लागला आहे. मात्र, पर्यटन व्यवसायाच्या वाढीबरोबरच श्रीवर्धन शहरामध्ये अनेक मोठ्या धनदांडग्यांनी हॉटेल्स बांधण्याचे उद्योग सुरू केले आहेत. यामध्ये काही व्यवसायिकांनी अगोदर आपल्या सुरू असलेल्या हॉटेलच्या परिसरातच नवीन हॉटेल विस्तार करुन बांधण्याचा प्रकार केलेला आहे. तर काही ठिकाणी हॉटेल व्यवसायिकांची नवीन बांधकामे सुरू आहेत.
मात्र, या सर्व ठिकाणांची पाहणी केली असता, जर का आग लागण्याची घटना या हॉटेल परिसरात घडली, तर त्या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी पोहोचू शकत नाही. अशी परिस्थिती असूनसुद्धा नगरपरिषदेकडून अशा प्रकारच्या बांधकामांना अभय देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. वास्तविक पाहता, हॉटेलमध्ये पर्यटक राहण्यासाठी येत असतात. येणार्या पर्यटकांची सुरक्षा ही हॉटेल मालकाच्या हातातच असते. त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाच्या हातात असते.
मात्र, ज्या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी बांधकाम परवानगी देताना नगरपरिषदेने कोणते निकष लावले आहेत? याबाबत जनतेमध्ये विविध चर्चांचे उधाण आलेले पाहायला मिळत आहे. तसेच श्रीवर्धन शहरामध्ये अनेक बांधकाम व्यावसायिकांनीदेखील आपल्या इमारती उभ्या करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, त्या ठिकाणची परिस्थिती पाहतादेखील, त्या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी पोहोचेल अशा प्रकारचे रुंद रस्ते उपलब्ध नसल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यामुळे अशा ठिकाणी आगीची घटना घडल्यास, अग्निशमन दल न पोहोचल्यास मोठ्या प्रमाणावरती जीवित व वित्तहानी होण्याचा धोका नाकारता येत नाही. हॉटेल व्यावसायिक व धनदांडगे बिल्डर यांच्यासमोर श्रीवर्धन नगरपरिषदेने स्वतःला नतमस्तक केले की काय? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. कारण, श्रीवर्धनमध्ये अशी अनेक बांधकामे सुरू आहेत, की ज्या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी पोहोचू शकत नाही. तरी अशा सर्व बांधकामांची नगररचना विभागामार्फत तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.