शेती टिकवण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न
| चिरनेर | प्रतिनिधी |
पारंपरिक शेती हा रायगडचा शेतीनिष्ठ गाभा आहे. त्यामुळे शेतकरी हा भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हल्ली शेती करणे परवडत नाही अशी ओरड ऐकायला मिळते, यात तथ्य देखील आहे. खर्च जादा आणि उत्पन्न कमी असे प्रकार अनुभवायला मिळतात. त्यातच नेहमीच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना जंग जंग पछाडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील विविध प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एकंदरीत नेहमीच होणारा निसर्गाचा कोप आणि वाढती महागाई यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. त्यामुळे नव्या पिढीने शेतीकडे पाठ फिरविल्याचे जाणवते.
एकेकाळी रायगड जिल्हा भाताचे प्रसिद्ध कोठार होते. रायगडच्या उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या औद्योगिकीकरणामुळे येथील अनेक भागात आज जेवढी शक्य होईल तेवढी देखील भात शेती केली जात नाही. हंदा पद्धत आणि परक्याचे शेतमजूर घेऊन, भातशेती लावण्याची ही पद्धत श्रमविभागणी आणि खर्चाची बचत करणारी ठरली होती.
परंतु, आधुनिक युगात वावरणारी पिढी आणि उरण तालुक्यात उभे राहिलेले नवनवीन प्रकल्प यामुळे काही प्रमाणात येथे लागवडीखाली शिल्लक राहिलेली भात शेती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांनी शेतीच पिकविली नाही तर आपण संगणकीय जीवनात काय खाऊन जगणार आहोत, हा गंभीर प्रश्न आहेच. पूर्वी रायगड उरणच्या अनेक ग्रामीण भागात परक्याशी मजूर घेऊन भात लावणी केली जात होती. यामध्ये प्रत्येक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतीवर भात लावणीसाठी व कापणी मळणीसाठी श्रमदान करायचा. हा सामूहिक लावणीचा प्रकार पूर्वा पार चालत आलेला होता. त्यामुळे कमी खर्च आणि मनुष्यबळाची बचत होत होती. परंतु आत्ताच्या आधुनिक युगातील नव्या पिढीने शेतीकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले आहे. त्याचे कारण देखील खरं आहे. शेतीसाठी लागणारी यंत्रसामुग्री व मजुरीचे दर भरमसाठ वाढल्याने शेती करणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. एकंदरीत सर्वत्र वाढती महागाई यामुळे शेती व्यवसाय धोक्याच्या संकटात सापडला आहे.
भात शेतीच्या लावणी, कापणीच्या कामाच्या वेळी अनेकदा मोठी गैरसोय होत होती. परंतु या प्रक्रियेत चार-पाच कुटुंबे एकत्र येत श्रमदानातून शेतीची कामे आनंदात करीत असत. त्यामुळे कशाचीही गैरसोय राहत नव्हती. त्यामुळे त्यावेळी शेतकरी समाधानी होता. मात्र, आपल्या वाडवडिलांनी जपलेल्या या परंपरा आजच्या आधुनिक युगातही प्रेरणादायी ठरत असल्या, तरी नैसर्गिक आपत्ती व महागाई यामुळे आज या परंपरांची जपणूक होत नसल्याने त्या परंपरा नामशेष होण्याच्या मार्गावर आल्या आहेत.
शेती टिकवण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाचे जोरदार प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या शेतीच्या विविध योजना, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी येथील कृषी विभाग प्रयत्नशील असून, शेती शाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण व मार्गदर्शनातून आधुनिक शेतीचे धडे दिले जात आहेत. तर सेंद्रिय शेती व फळ पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना आकर्षित केले जात आहे.
– अर्चना सुळ नारनवर,
उरण तालुका कृषी अधिकारी







