। रेवदंडा । प्रतिनिधी ।
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोर्लई गावात एका नवविवाहित तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि.29) उघडकीस आली आहे.
भाग्यश्री समीर बलकवडे (32) असे मृत तरुणीचे नाव असून, ती आपल्या नवविवाहित आयुष्यातील अवघ्या वर्षभरातले आनंदाचे क्षण साजरे करत होती. गणेशोत्सवासाठी कुटुंब मूळगाव कोर्लई येथे आले होते. दीड दिवसाचा गणपती उत्सव आनंदात साजरा झाला; परंतु दुसऱ्याच दिवशी अचानक वादातून ही घटना घडली.
मयत तरुणीची आई मंजुळा दत्ता पाटील (वय 55, राबोडी-ठाणे) यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, भाग्यश्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती समीर विलास बलकवडे, सासरे विलास महादेव बलकवडे, सासू मीना विलास बलकवडे, आणि नणंद वैष्णवी विलास बलकवडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी 11 नंतर भाग्यश्री आपल्या 3.5 महिन्यांच्या बालकाला आंघोळ घालत होती. यावेळी पतीकडून चुकून बालकाच्या डोळ्यात पाणी गेले. यावरून झालेल्या तक्रारीतून वाद निर्माण झाला. त्यावेळी सासूने समजूत घालून परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथून भाग्यश्री सोडून सर्वजण बाहेर गेले होते. परंतु काही वेळाने घरात दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून पाहिले असता भाग्यश्रीने गळफास घेतल्याचे दिसून आले.
याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कीरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बाचकर करत आहेत.







