। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील तळेगाव धरणग्रस्त असून येथील ग्रामस्थांना दिवाळीपूर्वी सर्व सुविधांसह घराचा ताबा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करीत गावाच्या पुनर्वसन ठिकाणी समाजाच्या राहणीमानाला उपयुक्त असे कोकणची छाप असलेले हिरवेगार गाव निर्माण केले जाईल, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी तळीये गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी तळीये दुर्घटनाग्रस्तांसाठी सुरू असलेल्या पुनर्वसन कामाचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या पाहणी दरम्यान मंत्री आव्हाड यांनी कंटेनर घरांची पाहणी केली. तसेच पुनर्वसित गावासाठी उपलब्ध करून देण्यात येणार्या पाणी, रस्ते, वीज, वृक्षारोपण इत्यादी सुविधांचा आढावा घेतला. यावेळी तळीये दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन महाजन, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशीद, ट्रान्सकॉन डेव्हलपर्सचे सुदिप्ता दास, नायब तहसीलदार प्रदीप कुडळ, वनक्षेत्र अधिकारी राकेश साहू, जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, सरपंच संपत तांदळेकर तसेच म्हाडाचे व जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.