| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतातील जवळजवळ एक तृतीयांश प्रौढ जनता मतदान करत नाही, हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना नव्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (ईव्हीएम) डेमोसाठी बोलावले आहे. या मशिनमुळे देशातील स्थलांतरितांना त्यांच्या घरापासून दूर असताना देखील मतदान करण्यास मदत होणार आहे. शिवाय मतदान करण्यासाठी वृद्धांचा प्रवास टळणार आहे. निवडणूक आयोगाकडून रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (आरव्हीएम) तयार करण्यात आले असून, त्यामुळे 72 मतदारसंघांची मते स्वीकारता येतील. मतदारानुसार हे यंत्र स्विच केले जाते. यामुळे दुर्गम मतदान केंद्रावरून आरव्हीएमच्या माध्यमातून 72 मतदारसंघांसाठी मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतात.
2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 67.4% मतदान झाले होते. अर्थात 30 कोटींहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नाही. यावरून निवडणूक आयोग चिंतीत आहे. दरम्यान आरव्हीएम मशीनचा डेमो 16 जानेवारीला आहे. या वेळी निवडणूक आयोगाची तांत्रिक तज्ज्ञ समितीही उपस्थित राहणार आहे. याशिवाय कायद्यात आवश्यक बदल, प्रशासकीय कार्यपद्धती आणि मतदान पद्धती किंवा तंत्र अशा सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांशी संबंधित मुद्द्यांवर आयोगाने 31 जानेवारीपर्यंत लेखी मते मागवली आहेत.