। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
महाड दुर्घटनेनंतर पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडीटचा मुद्दा समोर आला. त्यावेळी सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची मागणी शेकापच्या माध्यमातून करण्यात आली होती. सध्या राज्य सरकारकडे निधीची कमतरता आहे. श्रीवर्धन तालुक्यामध्ये निगडी येथे ब्रिज पडून दोन वर्ष झाली; मात्र निधीअभावी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट झालेले नाही. तसेच नवघर येथील पुलाचे काम तात्काळ सुरु करुन अन्य पुलांचे ऑडीट करावे, अशी मागणी शेकापचे माजी आमदार पंडीत पाटील यांनी केली आहे. माजी आ. पंडीत पाटील यांनी नवघर पुलाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
रायगड जिल्ह्यात शेकापच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. निसर्ग चक्रीवादळ, कोरोना आदी संकटात शेकापने रस्त्यावर उतरुन नागरिकांना आधार दिला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
रस्त्याबाबत बोलताना पंडीत पाटील यांनी सांगितले कि, अलिबाग-रोहा, पोयनाड-नागोठणे, आणि कोलाड मुरुड असे तीन रस्ते आमदार असताना मंजुर करुन घेतले होते. दोन रस्त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच रोहा-अलिबाग या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. गेल कंपनीतील वाहनांमुळे याठिकाणी रस्त्याची दूरवस्था झाली आहे. या रस्त्यासाठी कामाची वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे. आमदार असताना या रस्त्याला कार्यादेश मिळवून दिला आहे. त्यामुळे ठेकेदाराने काम करणे अपेक्षित आहे. ठेकेदार काम करीत नसल्यामुळे हे काम रखडले आहे.
रस्त्याचं राजकारण आजमितीस कधीच शेकापने केले नाही. सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकर्यांचे प्रश्न सोडविणे, जनतेची सेवा करणे आमचे काम आहे. त्यामुळे अलिबागमधील सर्व रस्त्यांना आमदार असताना मंजूरी मिळाल्याचे अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.