| रायगड | प्रतिनिधी |
हिवाळी हंगामात अनेकांना लज्जतदार पोपटी पार्ट्यांचे, सहलींचे वेध लागले आहेत. वालाच्या शेंगा भामरुडाच्या (भांबुर्डी) पाल्यात मडक्यात टाकून कांदा, बटाटा, रताळी तसेच अंडी, चिकन घालून त्यांची लज्जत वाढविली जाते. अवकाळी पावसामुळे स्थानिक गावठी वालाच्या शेंगा तयार होण्यास उशीर होणार असल्याने खवय्यांना पुण्यावरून आलेल्या वालाच्या शेंगांवरच बेत करावे लागत आहे. जिल्ह्यात पिकवलेल्या, चवदार टपोऱ्या दाण्याच्या गावठी शेंगांच्या पोपटीलाच अधिक पसंती आहे. मात्र, पावसामुळे नुकसान झाल्याने स्थानिक गावठी शेंगा अजून तयार झालेल्या नाहीत. उरणमध्ये काही ठिकाणी गावठी वाल मिळू लागले आहेत.
विदर्भात, खानदेशात ज्याप्रमाणे ज्वारी किंवा बाजरीच्या कणसांना भाजून केलेला हुर्डा प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणेच रायगड जिल्ह्यात गावठी वालाच्या शेंगांची पोपटी प्रसिद्ध आहे. ठिकठिकाणी शेतावर किंवा घराबाहेर मोकळ्या जागेत पोपटी पार्ट्यांची धम्माल पाहायला मिळते. काही ठिकाणी काव्यसंमेलन रंगतात तर गप्पा गोष्टींच्या मैफिलीमध्ये सुखदुःखाची देवाणघेवाण होते. अनेक जणांना यातून चांगले उत्पन्नही मिळते.
निडीच्या चवदार गावठी शेंगा पोपटीसाठी अस्सल गावठी शेंगांनाच पसंती असते. गावठी शेंगांमुळेच खरी लज्जत व चव टिकून राहते. मुंबई-गोवा महामार्गावर नागोठण्याजवळील निडी गावातील शेंगा रुचकर व टपोरे दाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. निडी गावालगतच्या जमिनीचा पोत कसदार असून परंपरागत पद्धतीने जपणूक करून ठेवलेले बियाण्याचाच वापर केला जातो. हे बियाणे दुसरे कुठे नेऊन पिकविल्यास अशी दर्जेदार शेंग होत नाही. या वालाला विशिष्ट चव, असून दाण्याचा आकारही मोठा असतो. सुरुवातीला बांधावर आलेल्या शेंगाची चव तर अधिकच रुचकर असते. यंदा अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे शेंगा तयार होण्यास उशीर झाल्याचे स्थानिक रहिवासी ॲड. महेंद्र धामणे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना रोजगार जिल्ह्यात रब्बी हंगामात साधारण साडे पंधरा हजार हेक्टरवर कडधान्याचे पीक घेतले जाते. त्यामध्ये सर्वात जास्त जवळपास चार हजार 381 हेक्टरवर वालाची लागवड केली जाते. गावठी वालाच्या शेंगांना सुरुवातीला चांगला दर मिळतो. किलोला 100 ते 150 रुपये, नंतर शेंगा सर्वत्र येवू लागल्यावर दर 40 ते 50 रुपये किलोपर्यंत जातो. लागवड व मशागतसाठी मेहनत लागते त्यात वातावरण अनुकूल असल्यास चांगले उत्पन्न मिळते. शेंगा सुकवून त्यापासून मिळालेल्या वालाची विक्री देखील केली असल्याचे नीलेश शिर्के या शेतकऱ्याने सांगितले.
भांबुर्डीच्या पाल्याचे गुणधर्म पोपटीत भांबुर्डीच्या पाल्याचा उपयोग केला जातो. याला गोरखमुंडी, वसई-विरारमध्ये बोडथोला, काही ठिकाणी कोंबडा तर रायगडमध्ये भांबुर्डी किंवा भामरूड असे म्हणतात. पावसाळ्यानंतर हा पाला रस्त्याच्या कडेला माळरानात उगवतो. पाल्यात औषधी गुणधर्म असतात. जखम झाल्यास पालाच्याच रस जखमेवर चोळतात. पोपटीमध्ये हा पाला टाकल्याने वाफेवर शेंगा चांगल्या शिजतात. तसेच, वालच्या शेंगा पोटाला बाधत नाहीत आणि लज्जतदार चव येते. अवकाळी पावसामुळे या पाल्याचेही नुकसान झाले आहे.
पत्र्याच्या डब्यातही पोपटी पोपटीसाठी मडक्यांना खूप मागणी असते. मडके उपलब्ध नसल्यास त्याऐवजी तेलाच्या पत्र्याच्या डब्यामध्येही पोपटी केली जाते. यासाठी पत्र्याच्या डब्याचे तोंड तीन बाजूने कापले असते. अगदी मडक्यात लावतात, त्याप्रमाणे कृती करून पत्र्याचे झाकण घट्ट लावावे व आगीवर उपडे ठेवावे. काही वेळेला मडके फुटते किंवा त्याला तडा जातो आणि आतील साहित्य करपते किंवा अर्धवट शिजते. मात्र पत्र्याच्या डब्यामध्ये ही भीती नसते.