। पनवेल । वार्ताहर ।
निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन नगरसेवक विजय खानावकर यांनी वृक्षारोपण करताना केले. कळंबोलीमधील सेक्टर-1 के.एल.ई कॉलेजच्या बाजूच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर क्रिकेट व इतर मैदानी खेळ खेळले जातात. अनुषंगाने क्रिकेटप्रेमी व खेळाडू तसेच कळंबोलीमधील नागरिकांनी या मैदानाच्या चहूबाजूला वृक्षारोपण केले. या ठिकाणी शोभेची झाडे न लावता मोठी सावली देणारी झाडे विजय खानावकर यांच्यामार्फत लावण्यात आली आहेत.
दरम्यान, लावलेल्या झाडांना उन्हाळ्यात पाण्याची कमतरता पडू नये म्हणून या ठिकाणी ठिंबक सिंचन करून जगवली जाणार असल्याचे आयोजक हणमंत चौधर यांनी सांगितले. यावेळी पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादीचे नेते सुदाम पाटील, सुधागड हायस्कूलचे प्रा. राजेंद्र पालवे, महादेव पाटील, अजय सूर्यवंशी, तुकाराम सरक, श्रीकांत फाळके, महेश गोडसे, निलेश दिसले, अजय सूर्यवंशी यांच्यासह क्रिकेट खेळाडू व शेकडो कळंबोलीकर नागरिक उपस्थित होते.