1993 साली बॉम्बस्फोटानंतर उभारलेले चेक पोस्ट बंद
| श्रीवर्धन | समीर रिसबूड |
श्रीवर्धन तालुक्याची किनारपट्टी सुरक्षेच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे, हे 1993 साली मुंबईतील बारा साखळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर दिसून आले. तालुक्यातील बंदरांचा वापर विदेशी वस्तूंच्या तस्करीसाठी सर्रास केला जात असे. 1993 साली मुंबईत झालेले बारा साखळी बॉम्बस्फोट व या स्फोटांसाठी वापरण्यात आलेले शक्तीशाली आरडीएक्स हे श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी बंदरावर उतरवण्यात आले, हे तपासात निष्पन्न झाले होते. देशविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी येथील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. त्यानुसार अनेक प्रमुख रस्त्यांवर व फाट्यांवर पोलीस चेक पोस्ट उभारण्यात आले. जाणार्या प्रत्येक वाहनाची दिवस-रात्र तपासणी केली जात होती. परंतु, सद्यःपरिस्थितीत पोलीस चेक पोस्ट बंद अवस्थेत आढळून येत आहेत.
श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरिहरेश्वर, म्हसळा पोलीस ठाणे हद्दीतील साई फाटा, वांगणी व कोळे फाटा आणि गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील संदेरी-पंदेरी या मुंबई- गोवा महामार्गाला जोडणार्या महत्त्वाच्या रस्त्यावर व फाट्यावर पोलीस चेक पोस्ट उभारण्यात आले होते. या चौक्यांवर पोलीस चौवीस तास पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत होते. सदरच्या चौक्या या आडरस्त्याला असल्याने तेथे मजबूत बांधकामाची इमारत असणे आवश्यक होते. त्यानुसार या चौक्यांची बांधणी करण्यात आली नव्हती. आजच्या स्थितीत पोलीस चेक पोस्ट इमारतींची अवस्था भयानक झाली आहे. भिंतीना गेलेले तडे, नादुरुस्त झालेला वीजपुरवठा व पिण्याच्या पाण्याची गैरसोय, मधल्या कालावधीत निवृत्त झालेले पोलीस कर्मचारी, बदली झालेल्या पोलीस कर्मचार्यांच्या जागांवर नवीन भरती न झाल्याने मनुष्यबळ कमी पडू लागले. परिणामी, चेक पोस्टच्या बकाल इमारती व मनुष्यबळाअभावी साई चेक पोस्टवगळता श्रीवर्धन पोलीस ठाणे हद्दीतील हरिहरेश्वर, म्हसळा पोलीस ठाणे हद्दीतील वांगणी व कोळे फाटा आणि गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील संदेरी-पंदेरी येथील चेक पोस्ट बंद अवस्थेत आहेत.
अधिक लक्ष देणे गरजेचे
रायगड जिल्ह्यातील वीस बंदरे संवेदनशील म्हणून भारतीय नौदलाने निश्चित केली आहेत. या बंदरांना सुरक्षा आणि संरक्षणाच्या दृष्टीने अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी बंदर हे 1993च्या बॉम्बस्फोटातील आरडीएक्स स्फोटके या बंदरात उतरल्याचे समोर आल्यामुळे हे संवेदनशील मानले जाते.
बंदरे अद्यापही असुरक्षित
बंदरांच्या सुरक्षितेतचा मुद्दा अनेकदा सभागृहात चर्चेत आला आहे. या बंदरांवर सीसीटीव्ही, कॅमेरे, दिव्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना गृहविभागाने दिल्या आहेत. समुद्रकिनार्यावर संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, येणार्या-जाणार्या अनोळखी व्यक्ती या दृष्टीने येथील सर्व चेक पोस्ट सुरू करावे, पोलीस विभागाने दुरूस्तीकरिता पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले आहे. तालुक्यातील किनार्यावर विदेशी वस्तूंची तस्करी व्हायची, पण काही महिन्यांपूर्वी अमली पदार्थ लाटांबरोबर किनार्यावर वाहात आले होते.
या चेक पोस्टवर रात्री नियमित तपासणी करण्यात येते. रात्रपाळीच्या अधिकारी व अंमलदार यांना तिथे जावे लागते. या सर्व ठिकाणी क्यू आर कोड बसवलेले आहेत. ते स्कॅन करावे लागतात. चौक्यांचे नूतनीकरण करण्यासाठी पाठपुरावा केला जातोय. यासाठी सीएसआर फंडामधून प्रयत्न सुरू आहेत. लवकरच चेक पोस्ट इमारती अद्ययावत करु. सुरक्षा कवच अभियान या चेकपोस्ट ठिकाणी राबविण्यात येते.
सविता गर्जे,
उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन