। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा परिषद, तालुका पंचायत समित्यांचे आरक्षण आणि मतदार याद्यांचा कार्यक्रम थांबवण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि.5) सर्व जिल्हाधिकार्यांना आदेश दिले. त्यामुळे राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया थांबवली गेली आहे.
महाराष्ट्र शासनाने 2017 च्या सदस्यसंख्येनुसार जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे याआधी जाहीर झालेले आरक्षण रद्द करण्यात आले. मात्र राज्य निवडणूक आयोगाने याबाबत जिल्हा पातळीवर काहीही निर्देश दिलेले नव्हते. आज निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आरक्षण आणि मतदार यादीची प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले.
याआधी ओबीसी आरक्षणाच्या निकालावरुन आरक्षण सोडती रद्द करण्यात आल्या होत्या. यानंतर पुन्हा एकदा आरक्षण सोडती घेण्यात आल्या. मात्र आज निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आरक्षण आणि मतदार यादीची प्रक्रिया थांबवण्याचेच आदेश दिले. त्यामुळे निवडणुका नेमक्या कधी होणार याबाबत संभ्रमावस्था आहे.