शासन लक्ष देत नसल्याने वाहनचालक संतप्त
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा नेरळ-कळंब रस्ता खड्ड्यात हरवला आहे. गेली दोन वर्षे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक संतप्त झाले आहेत. त्यात शासनाची यंत्रणा या रस्त्याकडे लक्ष देत नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेरळ-कळंब रस्त्यावर साडेतीन कोटी रुपये खर्चून ठेकेदार कंपनीने केलेले डांबरीकरण वर्षात उधळले आणि त्यामुळे हा रस्ता दोन तीन वर्षात खड्ड्यात हरवला आहे. अलिबाग येथील ठेकेदार कंपनीने घेतलेले या रस्त्याचे काम कर्जत तालुक्यातील स्थानिक ठेकेदाराने घेतले होते. त्या ठेकेदाराला कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचा आशीर्वाद असल्याने रस्त्यावरील डांबर एका वर्षात निघून गेले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती करून घेण्याची खबरदारी देखील घेतली नाही आणि त्यामुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यात या रस्त्यावरील उल्हासनदीवर असलेल्या पुलावरून पावसाळ्यात महापुराचे पाणी गेल्याने हा पूल देखील धोकादायक बनला आहे. तर पुलाच्या पुढे रस्त्यावरील खड्डे हे कोदिवले गाव येईपर्यंत रस्त्यातून वाहने कुठून न्यावीत असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहने जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर पायी चालता येईल अशी स्थिती या रस्त्याची स्थिती नाजूक बनली आहे. या रस्त्यावरील धामोते, मालेगाव, दहिवली, वंजारपाडा, कोदिवले, बिरदिले, अवसरे, वरई, पोशिर या सर्व गावातील लोकांना रस्त्यातील वाहतूक नकोशी झाली आहे.
- या रस्त्यामुळे आमचे पर्यटक कमी झाले असून त्यामुळे आमच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच जे काही पर्यटक येतात ते रस्त्याबाबत कुरकुर या रस्त्याकडे सरकारी यंत्रणा लक्ष देत नसल्याने आम्हाला पाठीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. आमची दुःखे लोकप्रतिनिधी यांना कळणार आहेत की नाही. – दत्तात्रय विरले, वाहनचालक.