। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात कळंब-नेरळ-माथेरान, नेरळ-कशेळे तसेच चिंचवली-कडाव- दहिवली हे राज्यमार्ग असून, त्या मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहे. या रस्त्यावरील मंजूर कामे करताना होणारा उशीर यामुळे वाहनचालक नाराज आहेत.
तालुक्यात सर्वात महत्त्वाचा रस्ता समजला जाणारा मुरबाड ते कर्जतपासून खोपोली या राष्ट्रीय महामार्ग 548 अ या रस्त्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून, रस्त्यावरील पुलांची कामे बाकी आहेत. तर, तालुक्यातील कर्जत-कल्याण राज्यमार्ग हादेखील सुस्थितीत असला तरी कर्जत ते वडवली या भागातील आरसीसी काँक्रिटच्या रस्त्याची स्थिती नाजूक आहे. त्या भागातील रस्त्यावर काँक्रिटच्या रस्त्यावर उंचवटे असल्याने दररोज अपघात होत आहेत. तालुक्यातील सर्वात खराब रस्ते तालुक्यातील राज्यमार्ग रस्ते असून, माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्यावर चार कोटी रुपये खर्चूनदेखील पूर्णपणे सुस्थितीत झाला नाही. त्यात नेरळ -कशेळे-भीमाशंकर या राज्य मार्ग रस्त्यावर नेरळ दामत परिसरात रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण अधिक आहे. तालुक्यातील चिंचवली-कडाव-जांभिवली-दहिवली-कोंदिवडे या राज्यमार्ग रस्त्यावर मागील दोन वर्षांपूर्वी निधी मंजूर आहे.
मात्र, यातून होणारी कामे संथगतीने सुरु असून, चिंचवली गाव भागातील सिमेंट काँक्रिटीकरण आता सुरु झाले असून, त्यामुळे गेली काही वर्षे स्थानिकांना आणि वाहनचालक यांना खड्डेमय रस्त्यातून जावे लागत आहे. यावर प्रशासन संबंधित ठेकेदारांना सार्वजनिक बांधकाम विभाग आक्रमक दिसलेला दिसत नाही आणि त्यामुळे ठेकेदारदेखील आरामात कामे करताना दिसत आहेत. परंतु, त्याचा फटका सामान्य वाहनचालक यांना होत आहे, त्याबद्दल कोणालाही काहीही वाटत नसल्याने वाहनचालक नाराज आहेत.