गणेगाव येथे प्रकल्पाचे उद्घाटन
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत टाळू गणेगाव येथील साई संस्कार ट्रस्टच्या माध्यमातून गायीच्या शेणापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. शेतकर्यांवर शेतीवर आधारित प्रकल्प साकारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन साई संस्कार ट्रस्टकडून देण्यात आले आहे.
तालुक्यातील गणेगाव येथे साई संस्कार ट्रस्टच्या माध्यमातून सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प उभारला आहे. त्या प्रकल्पात सेंद्रिय खत, कंपोस्ट खत, जीवामृत, घनजीवामृत, पर्यावरणपूरक गोवर्या यांचे उत्पादन करण्यात येणार आहे. शेतीपूरक व्यवसाय यांच्यासाठी सध्या सेंद्रिय खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मॉल आणि बाजारपेठेतदेखील सेंद्रिय खतांपासून पिकवलेल्या वस्तुंना मागणी आहे, त्यामुळे सेंद्रिय शेतीच्या वाढीला चालना मिळणार आहे. साई संस्कार ट्रस्टच्या भाग्यश्री वर्तक यांनी सेंद्रिय खतांचा निर्मिती करणारे प्रकल्प बनविण्याचे स्वप्न त्यांच्या पती राजेंद्र वर्तक यांचे होते. मात्र, त्यांच्या आकस्मिक निधनानंतर भाग्यश्री वर्तक यांनी सर्वांना बरोबर घेऊन आपल्या ट्रस्टच्या गणेगाव येथील जमिनीवर सेंद्रिय खत प्रकल्प साकारण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गायींचे संगोपन केले जात असल्याने गायींचे मलमूत्र यांचा उपयोग करून खत प्रकल्प यशस्वी होईल, असा विश्वास तेथील हेमंत कोंडीलकर यांना आहे. तर, संस्थेच्या भाग्यश्री तलवारे यांनी सेंद्रिय खत राज्यभर पोहचविण्यासाठी आपली संस्था काम करेल, असे आश्वासन प्रकल्पाच्या प्रमुख वर्तक यांना दिले.
या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी हालीवली ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रमिला बोराडे, विभागप्रमुख सुरेश बोराडे, मनोविकार तज्ज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान तलवारे, सुजाता आपटे आदी मान्यवर उपस्थित होते.