राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मागे घेण्यात आलेल्या कृषी कायद्यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कृषी विरोधी कायदा केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली आहे, पण संसदेत ते प्रायश्‍चित कसे करणार, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. राहुल गांधींनी ट्विट करत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, जेव्हा पंतप्रधानांनी शेतीविरोधी कायदा बनवल्याबद्दल माफी मागितली, तर संसदेत सांगा तुम्ही याबाबत प्रायश्‍चित्त कसे करणार? लखीमपूर प्रकरणाचे मंत्री कधी बडतर्फ करणार? शहीद शेतकर्‍यांना किती नुकसान भरपाई मिळणार? सत्याग्रहींवरील खोटे खटले कधी परत येणार? एमएसपीवर कायदा कधी? त्याशिवाय माफी अपूर्णच! असा हल्लाबोल करत त्यांनी अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी शेतकरी संघटना आणि विरोधक सरकारकडे सातत्याने करत आहेत. मात्र, वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात किती शेतकर्‍यांचा मृत्यू झाला, याचा आकडा नाही, त्यामुळे भरपाईचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी संसदेत सांगितले होते.

Exit mobile version