रत्नागिरीतील ‘या’ समुद्रकिनाऱ्यांचा होणार कायापालट

पर्यटन विकासाला मिळणार चालना

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

पर्यटनाला चालना देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील चार समुद्रकिनाऱ्यांचा कायापालट करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चार कोटी निधी खर्च करून जिल्ह्यातील भाट्ये, आरे-वारे, आंबोळगड व कशेळी या चार समुद्रकिनाऱ्यांचा विकास लवकरच करण्यात येणार आहे. रत्नागिरीतील या चार प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांवर आता पर्यटकांना चांगल्या पायाभूत सुविधांची सुविधा देण्यात येणार आहे. गोवा आणि केरळसारख्या राज्यांच्या धर्तीवर पर्यटनाचा विकास करण्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही कामे लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे.

मंजूर झालेल्या निधीतून भाट्ये किनाऱ्यावर जोडरस्ते, वाहनतळ, स्वच्छतागृहे आणि इतर आवश्यक सुविधा उभारली जाणार आहेत. तसेच आरे-वारे, आंबोळगड, कशेळी, आणि अणसुरे या किनाऱ्यांवरही याच प्रकारची सुविधायुक्त कामे सुरू करण्यात आली आहेत.

पर्यटकांचे किनाऱ्यांकडे आकर्षण वाढणार
प्रत्येक किनाऱ्याच्या विकासासाठी एक कोटी रुपये खर्च होणार आहे. यामुळे पर्यटनवाढीला मोठा वाव मिळणार असून पर्यटकांचे या किनाऱ्यांकडे आकर्षण वाढणार आहे. समुद्रकिनाऱ्यांवर उभ्य होणाऱ्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पर्यटकांना चांगला अनुभव मिळणार आहे, तसेच जिल्ह्याचे पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

Exit mobile version