1040 हेक्टर क्षेत्रातील जमीन ओलिताखाली
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्याचा पूर्व भाग हिरवागार करणारा राजनाला कालव्याचे पाणी शेतीसाठी दिले जाते. या पाण्यावर दुबार शेती केली जात असून, भाताचे शेत पिवळ्या सोन्याने बहरले आहे. दरम्यान, भाताची शेती कालव्याच्या पाण्यावर बहरली असून, साधारण 1040 हेक्टर जमिनीवर भाताचे पीक आले आहे.
राजनाला कालव्याची निर्मिती कर्जत पूर्व भागातील शेती ओलिताखाली आणण्यासाठी झाली. पुढे त्या कालव्याचे पाणी शेतीसाठी दरवर्षी दिले जात असताना वेळेवर कालाव्याची दुरुस्ती होणे गरजेचे असताना ती न झाल्यामुळे कालवे अनेक ठिकाणी पोकळ झाले होते. साधारण दोन हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणणार्या राजनाला कालव्याचा कोकण पाणी हंगाम 2014-15 साठी भातशेती तसेच अन्य तत्सम पिके घेण्यासाठी पाणी वाटपाचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. भातशेतीसाठी लागणारे पाणी किमान 120 दिवस मिळावे त्या दृष्टीने पाणी देण्यासाठी नियोजन करण्याची सूचना आ. महेंद्र थोरवे यांनी सूचना केली होती. त्यानुसार पाण्याचे वितरण व्हावे यासाठी पाटबंधारे खात्याने कालव्याची सफाई करून घेण्याचे काम केले आणि पाणी शेतीसाठी सोडण्याचा निर्णय घेतला.
यावर्षी डिसेंबर महिंच्या अखेरीस भिवपुरी येथील शून्य बंधारा येथे पाणी कालव्यात सोडण्यात आले. त्यानंतर राजनाला कालव्याचे पाणी शेतीसाठी जाते अशा 32 गावांतील शेतकर्यांनी भाताची दुबार शेती केली आहे. त्यानंतर भाताची शेती सुरू केली आणि त्यानंतर या भागातील तब्बल 1040 हेक्टर जमिनीवर भाताचे पीक बहरले आहे. हे पीक आता कापणीवर आले असून, भाताचे पीक अंतिम टप्प्यात आहे. त्या पिकाचा फायदा शेतकरी घेत असून, शेतकर्यांनी मजुरांचे आणि घरातील कामगारवर्गाच्या मदतीने भाताची कापणी सुरू आहे. मात्र, राजनाला कालव्याचे पाण्यावर दुबार भाताची शेती बहरली असून, भाताचे रोप आता पिवळ्या सोन्यासारखे दिसून येत आहेत. त्यामुळे भाताचे पीक आपल्या घरी नेण्यासाठी शेतकरी राजा सज्ज झाला असून, कापणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
राजनाला कालव्याचे पाणी शेतीसाठी सोडल्यानंतर शेतकर्यांनी दुबार शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यात भाताची तसेच भाजीपाला शेती करण्याचा प्रयत्न केला आहे. भाताच्या शेतीचे क्षेत्र हे 1040 हेक्टर एवढे असून, पुढील वर्षी हे क्षेत्र 1400-1500 हेक्टरपर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे.
अमित पारधे,
उपअभियंता, पाटबंधारे कर्जत