परप्रांतीयांमधून संक्रमण होत असल्याची चर्चा,नागरिक भयभीत
| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आक्षी-साखर गावामध्ये माणसे मरत आहेत, अशी अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भातीचे वातावरण आहे. अलिबाग तालुक्यात गॅस्ट्रोने दोघांचा बळी घेतला तर अन्य १८ जण सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये परप्रांतीयांचा समावेश असल्याने यांनीच कोणता तरी वेगळा रोग आणल्याने आक्षी-साखर गावामध्ये माणस मरत आहेत, अशी अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भातीचे वातावरण आहे.
आक्षी-साखर परिसरामध्ये मासेमारी व्यवसाय जोरात चालतो. या ठिकाणी परप्रांतीय नागरिक मोठ्या संख्येने स्थानिकांच्या बोटीवर कामाला आहेत. कोरोनाचे सावट, विविध नैसर्गिक वादळांचा फटका बसल्याने मासेमारी व्यवसाय डबघाईला आला आहे. पावसाळ्यात मासेमारी व्यवसाय बंद असतो. आता तो बऱ्यापैकी सुरू झाला आहे. त्यामुळे परप्रांतात गेलेले मजूर पुन्हा परतले आहेत. १९ ते २१ सप्टेंबर या कालावधीत तब्बल २० रुग्ण गॅस्ट्रोच्या आजाराने त्रस्त झाले. त्यांच्यावर अलिबागच्या सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत असताना दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकारानंतर २३ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच आक्षी-साखरमध्ये कोणता तरी रोग आला असून त्यामुळे माणसे मरत आहेत, असल्याची अफवा पसरल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, तसेच परप्रांतातील मजुरांमध्ये या रोगाचे संक्रमण झाल्याच्या चर्चांना उधाण आले.
बोटीवर काम करण्यासाठी दरवर्षी नवीन माणसे येत असतात. कधी-कधी त्यांना हवामान आणि बोटीवरील वास्तव्य रुचत नाही. काही आपल्या गावी परत जातात. गावात कसलाच व्हायरस आलेला नाही. नागरिकांनी अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वासही ठेवू नका.
-कैलास चौलकर, कोळी समाज, माजी अध्यक्ष
गावात कसलाही व्हायरस आलेला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. गावात काहींना त्रास झाला. तशी घटना मुंबई येथील मडमध्येही घडली आहे.
-आनंद बुरांडे, उपसरपंच, आक्षी
गावात कोणताही नवीन रुग्ण सापडला नाही अथवा कोणाचा मृत्यूही झालेला नाही. व्हायरस पसरल्याची अफवा आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या तब्येतीची काळजी घ्या.
डॅा. अभिजित घासे, आरोग्य अधिकारी, अलिबाग