जि.प.सीईओ डॉ. किरण पाटील यांचे आवाहन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत हर घर झेंडा अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. याबाबत शासनाच्यावतीने मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागात हर घर झेंडा अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे, शासकीय आस्थापना व नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वयंस्फुर्तीने लावावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
20 जून 2022 च्या शासन निर्णयानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक यांचे तसेच स्वातंत्र संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची भावना जनमाणसात कायम राहावी, या उद्देशाने देशात हर घर झेंडा हे अभियान राबविण्यात येत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर झेंडा अभियानांतर्गत 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये प्रत्येक शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर तर नागरिकांनी स्वत:च्या घरावर स्वयंस्फुर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करावी. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत यंत्रणांचा वापर करून सर्वांनी योग्य नियोजन करावे, असे शासन आदेशात नमुद आहे. नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वयंस्फुर्तीने लावायचा आहे. त्यासाठी ध्वजसंहितेच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक राहील, अशी माहिती डॉ. किरण पाटील यांनी दिली.
असा असेल राष्ट्रध्वज
केंद्रीय गृह विभागाच्या 30 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसुचनेनुसार भारतीय ध्वज संहिता – 2002 भाग – 1 मधील परिच्छेद 1.2 मधील राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर, सुत, सिल्क, खादी कापडापासून बनविलेला असेल, या तरतुदीमध्ये बदल करण्यात आला आहे. सदर बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या किंवा हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सुत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क, खादीपासून बनविलेल्या कापडाचे असावेत, असा उल्लेख केला आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या 15 ऑगस्ट रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण व्हावे, देशाप्रती भक्तीसह कृतज्ञतेची जाणीव वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने 11 ते 17 ऑगस्ट हे सात दिवस संपूर्ण जिल्हाभर हर घर झेंडा हा विशेष उपक्रम राबविला जाणार आहे. सर्व नागरिकांनी या विशेष उपक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे.
– डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड