| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नांगुर्ले गावाच्या हद्दीत रविवारी पहाटे दामखिंडी दिशेने जाणार्या रस्त्यालगत निर्जनस्थळी गोवंश जनावरांची हत्या करून मांस विक्रीसाठी नेण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात दोन ते तीन गोवंशीय जनावरे चोरी करून या ठिकाणी आणून त्यांची हत्या करून मांस नेले गेले. गोवंश तस्करी करणार्यांनी नवीन पद्धतीचा अवलंब केल्याची चर्चा सुरू असून, या घटनेची नोंद कर्जत पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील नांगुर्ले येथील जंगलात मृत जनावरे आढळून आल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली होती. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड आणि त्यांचे पथक तात्काळ पोहोचले. सध्या पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. बोकड आणि मेंढा यांचे मांस हे बाजारात तुलनेने महाग मिळते असते. त्यात गोवंशीय मांस 200 रुपये किलोने स्वस्तात विकल्याने हे मांस हॉटेल व्यवसायमध्ये आणि खाण्यासाठी विक्रीसाठी पाठवले जात आहे. नवी मुंबई, मुब्रा, ठाणे, पनवेल ठिकाणी हे मांस वाहनातून कापून छुप्या पद्धतीने नेत असल्याचे समोर असताना आता चक्क नवीन वर्षाच्या स्वागताला कर्जत तालुक्यात गोवंशीय जनावरांची कत्तल केल्याचे समोर आल्याने याचे मांस विक्रीसाठी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावर गोरक्षकांनी घटनेचा पोलिसांनी कसून तपास करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.