। आंबेत । वार्ताहर ।
दुष्काळाची झळ जशी दुष्काळग्रस्त भागात जाणवते आहे, तशीच धरण परिसरात त्याच्या दुरुस्ती अभावी करण्यात आलेल्या नियोजनानुसार जाणवत असते. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅ. ए. आर. अंतुले यांनी आंबेत खाडीपट्टा विभागाला भले मोठे संदेरी धरण देऊन संपूर्ण परिसराची तहान भागवली. मात्र गेली किमान 40 ते 45 वर्ष उलटली तरी अद्याप या धरणाची कोणतीही डागडुजी तसेच गाळउपसा प्रक्रिया न केल्यामुळे धरणातील बहुतांश भाग हा वाहून आलेल्या मातीच्या ढिगार्याखाली बुजलेल्या अवस्थेत आहे. सध्या या धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणेदेखील थांबले असून भविष्यात मोठा पाणी प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संदेरी धरण हे पूर्णतः माती आणि दगड यांच्या सहाय्यावर उभारण्यात आले असून धरणाचा बराचसा भाग हा आजच्या स्थितीत मोडकळीस अवस्थेत आला आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही अपघात होऊ नये, याकरिता प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. धरणातील पाण्याचा अतिसाठा बाहेर टाकण्यासाठी बांधण्यात आलेला ओव्हर फ्लोचा भाग मोडकळीस आला असून मागील वर्षी पडलेल्या मुसळधार पावसात देखील त्याचा भाग कमकुवत बनला आहे. त्यामुळे धरण परिसरात मोठा अपघात होऊ नये, याकरीता प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
आंबेत खाडीपट्टा विभागात पिण्याच्या पाण्यासाठी संदेरी धरण हा एकमेव पर्यायी स्रोत आहे. भविष्यात धरणाच्या कोणत्याही भागाची दुरुस्ती नसल्याने धरण असलेल्या परिसराला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या धरणाकडे मुख्यतः डागडुजी आणि गाळउपसा गोष्टींचा प्रश्न मार्गी लावावा. जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही. तसेच धरणातील पाणी साठा वाढण्यास मदत होईल.
-रवी पाष्टे