महापूरातून ओंडका काढण्याचे शर्तीचे प्रयत्न; विज वाहिनी कोसळण्यापासून वाचवली
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील उल्हास नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक झाडे उन्मळून पडली होती. ही झाडे नदीमधून वाहून जात असताना एक झाड विजेच्या खांबाला जाऊन अडकले होते. दरम्यान, ते झाड काढण्यासाठी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याने पाण्यात उतरून त्या विजेच्या खांबावर चढून झाडाचे ओंडके बाहेर काढले. संतोष करटूले असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांच्या कामगिरीने विजेच्या खांबांना धडकलेले झाडाचे ओंडके बाजूला करून विजेची वाहिनी कोसळण्यापासून वाचली आहे.
कर्जत तालुक्यातील उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या वावे या गावाच्या बाजूने वाहणाऱ्या नदीला पूर आला होता. त्यावेळी पूराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात झाडे वाहून आली. त्यात मंगळवारी (दि.7) दुपारी एक मोठे ओंडके पूराच्या पाण्यासोबत वाहत असताना वावे गावाजवळ वाहून जात असताना येथील एका विजेच्या खांबाला जाऊन धडकले. झाडाचे ओंडके एवढे प्रचंड आकाराचे होते की त्यामुळे विजेचे खांब कधीही कोसळून मोठा अपघात होऊ शकणार होता. त्यामुळे आजुबाजूच्या गावातील वीज पुरवठा संकटात येऊ शकणार होता. ही बाब लक्षात घेऊन महावितरणचे उप अभियंता चंद्रकांत केंद्रे आणि सहाय्यक अभियंता कर्जत दहिवली अनु पिंगळे हे वावे येथे पोहचले. त्यावेळी उल्हास नदीमधून वाहत आलेला झाडाचा ओंडका नदीमधून पलीकडे वीज वाहिनी नेणाऱ्या विजेचा खांब उखडून टाकू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, त्या ठिकाणी उपस्थित असलेले महावितरणचे वायरमन संतोष करटूले यांनी आपण विजेच्या खांबावर चढून ते झाडाचे ओंडके बाजूला करतो, अशी तयारी दाखवली. यावेळी पाण्याचा मोठा प्रवाह त्या विजेच्या खांबाच्या बाजूने जात असताना पाण्यात उतरून वायरमन संतोष करटूले हे विजेच्या खांबावर चढले. उल्हासनदी दुथडी भरून वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संतोष करतुले यांच्या पाठीवर दोरखंड बांधण्यात आला होता. शेवटी खांबावर पोहचलेल्या स्थानिक डोंगरपाडा गावातील तरुण संतोष करतुले यांनी तो लाकडाचा ओंडका तेथून बाजूला नदीमध्ये टाकण्याचे काम केले. त्या ओंडक्याने विजेचा खांब कोसळण्यापासून वाचला असून, त्या कामी तेथील एक कंत्राटी कामगार पाण्यामध्ये दोरखंड पकडून उभा राहीला होता. त्यामुळे वायरमन संतोष करतुलेच्या कामगिरी बद्दल चोहोबाजूंनी कौतुक होत आहे. तसेच, त्यांच्या जिद्दीमुळेच लाकडाचा मोठा ओंडका बाजूला करण्यात यश आले असल्याचे महावितरणचे उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी सांगितले.







