। मुंबई । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील सावित्री, काळ व गांधारी नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. परंतु कामाचा आवाका पाहता व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन यांत्रिकी विभागामार्फत जादा संयंत्राचा पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यानी सोमवारी लेखी उत्तराद्वारे दिली. याबाबतचा प्रश्न शेकापचे आ.जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.
महाड शहरातील पूरनियंत्रणासाठी या दोन नद्यांमधील गाळ काढण्याचे काम 4 जानेवारी 2022 रोजी हाती घेण्यात आले. सुरुवातीला त्या कामासाठी जलसंपदा विभागांतर्गत यांत्रिकी विभागातर्फे सावित्री नदी पात्रामध्ये 3 एक्स्केव्हेटर (पोकलेन), एक व्हील लोडर, 8 टिप्पर आणि एक डोझर व काळ नदी पात्रामध्ये 1 एक्स्केव्हेटर (पोकलेन) व 2 टिप्पर अशी संयंत्रे कार्यरत होती. परंतु कामाचा आवाका पाहता व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन यांत्रिकी विभागामार्फत जादा संयंत्राचा पुरवठा करण्यात आला. तसेच सावित्री नदीतील गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आल्याचे फडणवीस यांनी नमूद केले आहे.
मुळ प्रश्नात जयंत पाटील यांनी गाळ काढण्यासाठी पुरेशी यंत्र सामुग्री नसल्याने संबंधित कामास विलंब होत आहे. असा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच मुख्य नदी पात्रातील गाळ काढल्यानंतर ग्रामीण भागातून मुख्य नदीपात्रामध्ये येणारे पाणी पुढील पावसाळ्यात या गाळासह आल्यास पुन्हा पुरसदृष्य स्थिती निर्माण होवू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे ही कार्यवाही विशिष्ट कालावधीत पूर्ण करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.