क्रिकेटविश्वातील यशस्वी प्रशिक्षक-कर्णधार
दोघांच्या कार्यकाळात टीम इंडियाने मोडले सर्व रेकॉर्ड्स
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर प्रशिक्षण रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्याआधी विराट कोहलीने स्पर्धेनंतर आपण टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे शास्त्री यांच्या पदाची जागा यापुढेद वॉल म्हणून प्रसिद्ध असलेले राहुल द्रविड घेणार असून, टी-20 संघाची धुरा रोहित शर्माकडे आली आहे.
शास्त्री-कोहली यांचे कार्यकाळात भारतीय क्रिकेटने गाठलेली उंची शानदार होती. त्यामुळे शास्त्री-कोहली ही प्रशिक्षक-कर्णधाराची जोडी क्रिकेटविश्वात सुपरहीट ठरली. याव्यतिरिक्त शास्त्री-कोहली यांच्या मार्गदर्शनात दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच मायभूमीत जाऊन टी-20 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. 2017 साली भारताने श्रीलंकेला 3-0 असा क्लीन स्पीप दिला. तसेच पहिल्यांदाच वेस्ट हंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकताना व्हाईटवॉश दिला.
इंग्लंडमध्ये वर्चस्व
भारतीय संघाने यावर्षीचा इंग्लंडचा दौर अक्षरशः गाजविला. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत भारताने आपली ताकद दाखविली.
कसोटी अजिंक्यपद विजेतेपद
यावर्षी झालेल्या पहिल्या वहिल्या कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेची अंतिम फेरी गाठत टीम इंडियाने ऑस्टे्रलिया आणि इंग्लंडचे आव्हान मोडीत काढले. मात्र, अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध आठ गड्यांनी पराभव पत्करावा लागल्याने भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
विश्वचषक उपांत्य फेरी
इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी 2019 विश्वचषक स्पर्धेत शास्त्री-कोहली यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने अपराजित राहण्याची कामगिरी करीत दिमाखात उपांत्य फेरी गाठली. साखळी फेरीत अव्वल संघ ठरताना भारताने अव्वल स्थानी कब्जा केला. परंतु, उपांत्यफेरी न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्कारावा लागल्याने भारताला स्पर्धेबाहेर व्हावे लागले.
बॉर्डर-गावास्कर ट्रॉफीवर कब्जा
ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात नमविणे, हे प्रत्येक संघासाठी दिव्यच असते. परंतु, हे दिव्य एकदा नव्हे, तर सलग दोन वेळा पार करण्यात भारतीय संघाला यश मिळाले. शास्त्री-कोहली यांच्या मार्गदर्शनात टीम इंडियाने 2018-19 मध्ये सर्वप्रथम बाजी मारली. यानंतर पुन्हा 2020-21 मध्ये पुन्हा ऑस्ट्रेलियाला धूळ चारली.