। पनवेल । प्रतिनिधी ।
आशिया खंडातील सर्वात मोठ्या पोलाद बाजाराच्या शेजारील खिडूकपाडा हे गाव मूलभूत सुविधांपासून आज देखील वंचित आहे. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अत्यंत भयावह परिस्थितीत जगणार्या येथील ग्रामस्थांना हक्काच्या सुविधा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी अॅड जनरल कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर प्रभुदास भोईर आक्रमक झाले आहेत.
हा रस्ता दुरुस्त करण्याकामी लोखंड बाजार समिती आणि सिडको एकमेकांकडे बोट दाखवतात. वास्तविक पाहता सिडकोकडे 2017 साली केएलएम 237 क्रमांकाच्या दस्तऐवजानुसार रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते सुभाष गायकवाड यांनी याचवेळी खिडूकपाड्याहून कळंबोलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाकडे जाणार्या रस्त्याची निर्मिती करण्याचा अत्यंत गंभीर मुद्दा उचलून धरला. ग्रामस्थांना दोन किलोमीटरचा वळसा घालून कळंबोली शहरात प्रवेश करावा लागतो. बाजारहाट करणे, शाळा, शिकवण्या, दवाखाने तसेच अन्य गरजांसाठी ग्रामस्थांना कळंबोली वसाहतीमध्ये यावे लागते. तूर्तास या ठिकाणी वहिवाट रस्त्याचा वापर ग्रामस्थ करत आहेत. सदर रस्ता कच्च्या स्वरूपाचा असल्यामुळे पावसाळ्यात येथे चिखलाचे साम्राज्य पसरते. संबंधित आस्थापनाने हा रस्ता लवकरात लवकर करून द्यावा. नागरिकांचा संयम संपलेला असून येत्या दोन आठवड्यात नवीन रस्ता झाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.
खिडूकपाडा येथे येण्यासाठी असणार्या रस्त्यांवर महाभयंकर खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यांवरून सायकल, दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवणे अशक्य झाले आहे. रात्रीच्या वेळेस खड्ड्यांमध्ये पडून अपघात होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.
– प्रभुदास भोईर, शेकाप वाहतूक सेल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष