स्मार्ट मीटरच्या वाढीव बिलाबाबत विचारला जाब; स्थिर आकारणीसह इतर करांचा सावळा गोंधळ उघड
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
स्मार्ट मीटरमुळे तिपट्टीने वीज बिल येत असल्याने ग्राहक मोठ्या संकटात सापडले. अखेर शेकापने चेंढरे येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात धडक देऊन राजेश भगत या अधिकाऱ्याला घेराव घातला. स्मार्ट मीटरच्या वाढीव बिलाबाबत जाब विचारून वीज बिलाच्या स्थिर आकारणीसह इतर करांचा सावळा गोंधळ उघड केला. शेकाप महिला आघाडी ॲड. मानसी म्हात्रे यांनी वाढलेल्या बिलाबाबत अधिकाऱ्यांची उजळणीच घेतली. दरम्यान स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांबाबत गुरुवारी (दि.30) निवेदन देण्यात आले.
यावेळी शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, वेश्वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, अलिबाग नगरपरिषदेचे नगरसेवक अनिल चोपडा, जमाल सय्यद, माजी नगरसेविका संजना कीर, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, दत्ता ढवळे, नरेश गोंधळी आदी शेकापचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच संतप्त ग्राहक उपस्थित होते.

यावेळी ॲड. मानसी म्हात्रे यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून अलिबाग तालुक्यासह शहरी भागात स्मार्ट मीटर बसविण्याचा तगादा सुरु करण्यात आला आहे. सक्तीने मीटर बसविले जात आहेत. अन्यथा गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रक्षोभ वाढला आहे. महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. ग्राहकांना विश्वासात न घेता मनमानी पध्दतीने कारभार चालविला जात आहे. सुस्थितीत असलेले जूने मीटर काढून नवीन मीटरचा बोजा ग्राहकांवर टाकला जात आहे.
स्मार्ट मीटर सक्तीने लावण्यास विरोध असतानाही ग्राहकांना धमकावून मीटर लावले जात आहेत. ग्राहकांसोबत बैठका घेऊन त्यांना विश्वासात घेऊन स्मार्ट मीटर बसविण्याबाबत अनेकवेळा सांगूनही आपल्याकडून कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांना यापूर्वी नियमीत बिल येत होते, त्याच्या तीन पटीने बिल या स्मार्ट मीटरमुळे येत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे ग्राहकांवर आर्थिक संकट उभे राहिले असल्याची बाब मानसी म्हात्रे यांनी कार्यकारी अभियंता राजेश भगत यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच स्थीर आकार कर व इतर करांचा बोजा लावून भरमसाठ बिल ग्राहकांच्या माथी मारणे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले.
अलिबाग तालुक्यातील व शहरातील वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी, नव्याने बसविलेले मीटर काढून यापुर्वीचे इलेक्ट्रॉनिक मीटरची पुर्नजोडणी करण्यात यावी, ग्राहकांना विश्वासात न घेता, त्यांच्या नकळत बसविलेल्या स्मार्ट मीटरची आलेली भरमसाठ वीज बिले तात्काळ रद्द करावी, स्मार्ट मीटर बससविण्यापुर्वी नियमीत येत असलेल्या युनीटनुसार, बिलांच्या प्रमाणात विज बील आकारण्यात यावे अशा वेगवेगळया मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांची योग्य पध्दतीने कार्यवाही झाली नाही, तर लवकरच कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा ॲड. मानसी म्हात्रे यांनी निवेदनातून दिला.
जनतेची लूट थांबवा - चित्रलेखा पाटील
स्मार्ट मीटर असे गोंडस नाव देऊन महाराष्ट्रातील सर्वसामान्यांची स्मार्ट लूट करण्याचे काम सरकार करत आहे. हा प्रकल्प जनतेच्या हितासाठी नसून काही मोजक्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी राबवला जात आहे, असा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केला. शेकापने सुरुवातीपासूनच स्मार्ट मीटर प्रकल्पाला विरोध केला असून, सर्वसामान्य ग्राहकांवर होणाऱ्या आर्थिक परिणामांविरोधात सातत्याने आवाज उठविला असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रलेखा पाटील म्हणाल्या, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ग्राहकांना भरमसाठ वीजबिले येत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अनेक ठिकाणी ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मीटर बसवून घेतला नाही, तर वीजपुरवठा खंडित केला जाईल, अशी धमकी नागरिकांना दिली जात आहे. ही पद्धत लोकशाहीला धरून नाही.
शेकापच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने परिपत्रक काढून स्मार्ट मीटरची सक्ती नसल्याचे स्पष्ट केले होते. असे असतानाही काही ठिकाणी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सक्ती करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सरकार आणि ठेकेदारांना मीटर बसविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे; मात्र महाराष्ट्रातील जागरूक जनता हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. शेतकरी कामगार पक्ष सर्वसामान्य ग्राहकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटरची सक्ती होऊ दिली जाणार नाही. स्वर्गीय नारायण नागू पाटील यांनी ज्या पद्धतीने शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी खोतशाहीविरोधात संघर्ष उभारला, त्याच परंपरेत आजच्या काळातील कॉर्पोरेट खोतांविरोधात लढा उभारण्याची वेळ आली आहे, असे सांगत चित्रलेखा पाटील यांनी सरकारला इशारा दिला.
वाढीव बिलाबाबत सर्वसामान्य ग्राहक मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. स्मार्ट मीटर सक्तीमुळे हे बिल वाढत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. योग्य ती कार्यवाही केली नाही म्हणून महावितरणच्या या कारभाराविरोधात शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड.मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर धडक दिली. त्यांना निवेदनही दिले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी मागण्यांची दखल घ्यावी. अन्यथा याच कार्यालयावर उपोषण केले जाईल.
सुरेश घरत,
शेतकरी कामगार पक्ष, तालुका चिटणीस – अलिबाग







