| मुंबई | प्रतिनिधी |
गेल्या दोन, तीन महिन्यात राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षानंतर रविवारी अचानकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरमाईची भूमिका घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे टाळी देण्यासाठी हात पुढे केला आहे. मैत्री सोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात, असे म्हणते त्यांनी मनोमिलनाची तयारी दर्शविल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
रविवारी जागतिक मैत्रीदिन साजरा झाला. त्यानिमित्ताने भारत जैन महामंडळ यांच्या वतीने आयोजित विश्व मैत्री दिवसाच्या क्षमापना समारोहाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून जैन साधू आणि साध्वींना अभिवादन करून त्यांचे आशिर्वाद घेतले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. याच कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी मैत्री दिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंना झालं गेलं विसरुन जा, असं अप्रत्यक्षपणे सांगत एकत्र येण्याची साद घातली. मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात पण क्षमा करण्यासाठी मोठं काळीज लागतं, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी मैत्रीचा चेंडू ठाकरेंच्या कोर्टात ढकलला. उद्धव ठाकरेंनी पुनश्च हरिओम म्हणत मागील अडीच महिन्यांमधल्या घटना विसरुन आवाज द्यावा, अशी अपेक्षाच एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्ष बोलून दाखवली.