जिल्हासंपर्क प्रमुख बबन पाटील यांचे प्रतिपादन
| पनवेल | वार्ताहर |
पूर्वीची कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकत्र लढून विजय मिळवला होता. आता तर या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) त्यांच्यासोबत मैदानात उतरली असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा दुसर्यांदा विजय निश्चित असून, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एक पाऊल पुढे असणार, असे प्रतिपादन पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे आयोजित महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जाहीर मेळाव्यात शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील यांनी केले.
या मेळाव्याला जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शेकाप नेते जे.एम. म्हात्रे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर.सी. घरत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, ज्येष्ठ नेते जी. आर. पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, दीपक निकम, योगेश तांडेल, प्रदीप ठाकूर, शशिकांत डोंगरे, एकनाथ म्हात्रे, विश्वास पेटकर, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक कल्पना पाटील, काँग्रेसच्या नेत्या श्रुती म्हात्रे, ज्ञानेश्वर बडे, सुदाम पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व्यासपीठावर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बबन पाटील यांनी सांगितले की, शिवसेनेचा कोकण हा पूर्वीपासून बालेकिल्ला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान बाळाराम पाटील यांना होणार आहे व निश्चितच आपण पहिल्या फेरीपासून आघाडीवर असू, असा विश्वास बबन पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर, काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनीसुद्धा भाजपसह मिंधे सरकारवर जोरदारपणे टीका करीत कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन बाळाराम पाटील यांचा प्रचार केला पाहिजे. शिक्षकांची भेट घेऊन बाळाराम पाटील यांनी केलेले सहा वर्षांतील शिक्षकांसाठी केलेले योगदान सांगितले पाहिजे. या निवडणुकीत शिवसेना आपल्याबरोबर आहे, त्यामुळे ज्याप्रमाणे पनवेल अर्बन बँकेची निवडणूक आपण एकहाती जिंकलो, तशीच ही निवडणूकसुद्धा आपण जिंकू ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाळाराम पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक हरेश मोकल यांनी, तर आभार प्रदर्शन प्रीतम म्हात्रे यांनी केले.