। अलिबाग । प्रतिनिधी ।
नैसर्गिक आपत्ती असो, वा कोव्हिड महामारी तसेच शैक्षणिक, सामाजिक अशा प्रत्येक समाजोपयोगी कार्यात शेतकरी कामगार पक्ष नेहमीच अग्रेसर राहिला आहे. याच पार्श्वभुमीवर शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने रायगड जिल्ह्यात सायकल वाटप, लसीकरण करणार्यास मोफत धान्य वाटप असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. मात्र गरीबांच्या घामावर स्वतःची पोळी भाजणार्या शिवसेना नेत्यांनी हे उपक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न करुन स्वतःची प्रतिमा मलिन केली असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. रेवदंडा येथे शेकापच्या माध्यमातून सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेप्रसंगी शिवसेना नेते तथा जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी गरिबांना दमदाटी करीत उपक्रम बंद पाडण्याची लज्जास्पद कामगिरी केली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांच्यावर जोरदार टिका होत असल्याचे समोर आले आहे.
कोरोनामुळे हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला. तर हजारोंच्या नोकर्या गेल्या. त्यामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले. अलिकडेच युक्रेन-रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे तेलाचे भावही वधारले आहे. त्यामुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी रायगड जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनाची तसेच युद्धाची झळ मोठ्या प्रमाणात बसू नये, याकरीता शेकापच्या माध्यमातून लसीकरण करणार्यास मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून शेकापच्या जिल्हा आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांचे कौतुक होत आहे.
समाजकार्यात राजकारण न करता जनतेच्या हिताचे काम करण्याचं धोरण स्वीकारुन चित्रलेखा पाटील गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबवित आहेत. परिणामी, बिथरलेल्या सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी रेवदंडामधील लसीकरण तसेच धान्य वाटप मोहिम बंद केली. समाजहिताची कामे न करण्याची वृत्ती असल्याने रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य, शिवसनेचे कार्यकर्ते सुरेंद्र म्हात्रे यांनी केवळ श्रेय आणि राजकिय स्टंट मारण्याच्या इच्छेपोटी हे लज्जास्पद कृत्य केल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले.
गरिबांच्या तोंडचा घास पळविला
कोरोनामुळे कुटूंब प्रमुखाची नोकरी गेली. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलो. लसीकरण केल्यास धान्य मिळेल व उपासमार टळेल, ही अपेक्षा होती. मात्र सुरेंद्र म्हात्रे यांच्यामुळे निराशाच पदरी पडली. आता पुन्हा एकवेळच्या धान्यासाठी धडपड करावी लागेल. – प्रतिक्षा कोळी, रेवदंडा
समाजकारण करीत असताना केवळ विरोध म्हणून राजकारण करणार्यांमुळे जनतेचे हाल होत आहेत. चौल- रेवदंडा येथील अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित राहिले. शासनाला मदत तसेच नागरिकांचे आरोग्य सदृढ रहावे, यासाठी हा उपक्रम राविण्यात आला. लसीकरण तसेच धान्य वाटप रोखल्याने कोणीही शेकापला समाजकार्य करण्यापासून रोखू शकणार नाही. भविष्यात शेकाप कुणालाही न घाबरता अधिक उर्जेने समाजकार्य पूर्ण करेल. – शरद वरसोलकर, शेकाप कार्यकर्ते