। अलिबाग । वार्ताहर ।
मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण आणि उत्सवांवर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्याची वेळ ओढवली होती. मात्र मागील अनेक महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून निर्बंधात शिथिलता आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी सण-उत्सवांवरील निर्बंधदेखील उठवण्यात आल्याने गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला ठाणेकर नागरिकांचाही चांगला प्रतिसाद लाभला. तसेच शाळांमध्येही यंदा जन्माष्टमीचा उत्साह दिसून आला असून, अनेक शाळांमध्ये बच्चे कंपनीदेखील बालकृष्णाच्या पेहरानात नटूनसजून आल्याचे दिसून आले.